श्रीरामपूर – तालुक्यातील गोंडेगाव येथे गोदावरी उजवा तट कालव्यावरील चारी क्रमांक 19 व 20 वरील टेलच्या भागातील पाझर तलाव ओहोर फ्लो च्या पाण्याने भरुन मिळावे या मागणीसाठी श्रीरामपूर- पूणतांबा राज्य मार्गावर सुमारे पाच तासाच्या रास्ता रोकोनंतरही पाटबंधारे विभागाने ठोस भूमिका न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांना व महिलांनी केवळ आश्वासनावर परत एकदा आंदोलन मागे घेतले.
गोदावरी उजवा तट कालव्यावरील टेलच्या भागात पर्जन्यमान अत्यंत कमी असून पिण्याच्या पाण्यासह जनवरांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मागील आंदोलनात ओहोर प्लोच्या पाण्याने टेलचे पाझर तलाव भरून मिळावे असे लेखी आश्वासन दिले. मात्र शेतीचे आवर्तन चालू केल्याने तलाव भरणे मागे राहिले.
नंतर ग्रामसभा घेऊन आगामी विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार तसेच गावात सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी, शाळा बंद, गाव बंदचे ठराव करुन संबधित विभागाला पाठविण्यात आले. परंतु प्रशासकीय पातळीवर कुठेच दखल घेतली गेली नाही. पाटबंधारे विभागाच्यावतीने लाहोर आंदोलन ठिकाणी तबल चार तासांनी दाखल झाले.
श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसूद खान, जिल्हा पोलीस उपअधीक्षक मदने, तहसीलदार प्रशांत पाटील यांनी प्रशासकीय पद्धतीने संतप्त शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांबरोबर गावचे शिष्ट मंडळ घेऊन प्रत्यक्ष भेट घेवून पाझर तलावाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
परंतू या रास्ता रोको आंदोलनाची व ग्रामसभेचे ठराव होऊन देखील कुठलीच दखल घेतली गेली नाही. या आंदोलनात शेतकरी, गावातील महिला, शाळेतील मुले सहभागी झाले. भर उन्हात पाण्यासाठी पाच तास बसूनही कुठलेच ठोस आश्वासन मिळाले नाही याबाबद सरकारचा निषेध करण्यात आला.