हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा उद्या हिंगोली जिल्ह्यात दाखल होणार आहे; मात्र स्वागतासाठी जीगरी दोस्तच नाही.. राहुल गांधी यांच्यासाठीचा हा भावनिक प्रसंग असणार आहे. मोदींच्या लाटेत 2014 साली मराठवाड्यात केवळ दोनच खासदार निवडून आले होते आणि त्यातील एक म्हणजे राजीव सातव..
काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे केवळ काँग्रेसच नाही तर सर्वच पक्षातील नेत्यांनी हळहळ व्यक्त केली होती. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या छोट्याशा शहरातून पुढे येत ते दिल्लीतील महत्त्वाच्या राजकारण्यांपैकी ते एक नेते बनले होते.. काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेसला मोठा धक्का बसला.. कोरोनामुक्त झाल्यानंतर राजीव सातव यांना सायटोमेगॅलो या विषाणूचा संसर्ग झाला होता. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात 47 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला होता.
राजीव सातव म्हणजे दिल्लीतला महाराष्ट्रातला सर्वांत तरुण चेहरा.. काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आणि राहुल गांधींचे विश्वासू सहकारी अशी राजीव सातव यांची ओळख होती. 2014 आणि 2017 मधील त्यांच्या कामगिरीमुळे राजीव सातव हे नाव सर्वदूर पसरले..
राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य म्हणून संघटनेसाठी काम पाहिले. सातवांनी आपली राजकीय कारकीर्द पंचायत समितीपासून सुरू केलेली पण तरी फार कमी काळात त्यांनी दिल्लीत स्वत:ची ओळख निर्माण केली.
भाजपची खेळी! गुजरात निवडणुकीसाठी 160 उमेदवारांची यादी जाहीर, माजी मुख्यमंत्र्यांसह 8 मंत्र्यांना “डच्चू” https://t.co/uoXtnm8oDr
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 10, 2022
2014च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले. त्यातले हिंगोलीतून निवडून आलेले राजीव सातव एक. त्यामुळेच त्यांच्या विजयाची दखल महाराष्ट्रातल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत घेण्यात आली. त्यानंतर राजीव सातवांनी कधी मागे पाहिलेच नाही.
राजकारणाचा वारसा तसा त्यांना घरातूनच मिळालेला होता. त्यांची आई रजनी सातव या काँग्रेसच्या आमदार आणि राज्यसभेच्या खासदार होत्या. मात्र तरीही राजीव सातवांनी निवडणुकीच्या राजकारणाची सुरुवात पंचायत समितीपासून केली होती. त्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील तळागाळातल्या प्रश्नांची जाण होती.
सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. त्यामुळेच लोकसभेचे खासदार असताना 2017 मध्ये आधार विधेयकावर विरोधी पक्षाकडून सर्वांत आधी बोलण्याची संधी त्यांना देण्यात आली होती.
संसदेत सर्वात जास्त प्रश्न विचारणारे एकमेव खासदार राजीव सातव सातव यांना संसदरत्न पूरस्कार देखिल मिळाला होता.
मनरेगा, दुष्काळ, शेती, रेल्वेपासून ते IIM आणि कंपनी कायद्याच्या प्रश्नांवरही त्यांनी लोकसभेत प्रभावीपणे आपली भूमिका मांडली होती. काँग्रेसकडून निवडणुकीच्या राजकारणातली एक एक वरची पायरी चढत असताना त्यांनी काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवरही आपली वाटचाल तेवढ्याच जोमाने सुरू ठेवली होती..
महत्त्वाचे म्हणजे सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे तळागाळताला फिडबॅक त्यांच्यापर्यंत पोहचत होता.
राहुल गांधींचे विश्वासू सहकारी –
2008 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी 2009 मध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक जिंकली. त्याच्या पुढल्याच वर्षी म्हणजे 2010 मध्ये त्यांच्याकडे युवा काँग्रेसची राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी सोपवण्यात आली. तब्बल चार वर्षं ते राष्ट्रीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. त्यामुळे त्यांची राहुल गांधींशी जवळीक वाढली आणि ते राहुल ब्रिगेडच्या प्रमुख सदस्यांपैकी एक झाले होते..
आता राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राजीव सातव यांच्या घराजवळून जात आहे.. मात्र राजीव सातव आता या जगात नसल्याने राहुल गांधी यांच्यासाठी हा भावनिक प्रसंग असणार आहे.. या आधी राहुल गांधी हे 2014 साली राजीव सातव यांच्या प्रचारासाठी कळमनुरी आले होते आणि आज दुसऱ्यांदा राहुल गांधी त्यांच्या दोस्ताच्या गावात येणार आहेत.. मात्र स्वागतासाठी जीगरी दोस्त नसल्याने राहुल गांधी यांच्या साठी हा सर्वाधिक भावनिक क्षण असणार आहे..