कराड – टोमॅटो व करोनाचा काहीही संबंध नाही. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. मात्र खोट्या माहितीव्दारे अफवा पसरवली आहे. त्यामुळे राज्यातील टोमॅटो उत्पदकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्याचा शासनाने सर्वे करून त्वरीत केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे त्याची नुकसान भरपाई मागावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
दोन दिवसापूर्वी टोमॅटोमुळे कोरोनाचा प्रसार होतो, अशी बातमी प्रसिध्द झाली. त्यामुळे राज्यभरात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तज्ञांची माहिती व अभ्यासानुसार करोना व टोमॅटोचा काहीही संबध नाही. त्याबाबत ट्विट करून त्याची वस्तूस्थिती समोर आणली आहे.
या अफवेमुळे राज्यातील शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. चिकननंतर आता शेतकऱ्यांशी व त्याच्या टोमॅटोसारख्या उत्पादकाचा नाहक संबंध जुळवला जातो आहे. त्यावरही नियंत्रण आणण्याची मागणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
आ. चव्हाण म्हणाले, केवळ काहीतरी ब्रेकींग न्यूज देण्याच्या नादात चुकीच्या माहितीच्या आधारावर खोटी बातमी करणाऱ्या त्या राष्ट्रीय न्यूज चॅनेलवर कारवाई होण्याची गरज आहे. शेती म्हणजे काय? याची काहीही माहिती नसताना केवळ ब्रेकींग न्यूजच्या फंदात काहीतरी वेगळे करण्याचा भास निर्माण केले जातो. त्याचा फटका टोमॅटो उत्पादकांना बसला आहे.
राज्यभरात शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान त्यामुळे झाले आहे. त्यामुळे अशा बेफीकरपणा व बेजबाबदार वर्तनावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. कोणताही शास्त्रीय आधार नसताना तशी बातमी करणाऱ्या त्या राष्ट्रीय हिंदी न्यूज चॅनेलवर कारवाई करावी. त्यांचे ते चॅनेलवर आठवडाभर बंदी आणावी, अशी मागणी केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली असल्याचे आ. चव्हाण यांनी ट्वीट करून केली आहे.