ढाका -अम्फान या महाचक्रीवादळाने भारताचा शेजारी असणाऱ्या बांगलादेशलाही तडाखा दिला. त्या वादळाच्या घणाघातामुळे त्या देशात 10 जण मृत्युमुखी पडले.
पश्चिम बंगालमधून सरकलेले अम्फान वादळ बांगलादेशात जाऊन थडकले. त्या वादळाचा मोठा फटका किनारपट्टीलगतच्या गावांना बसला. वादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस कोसळल्याने बरेच भाग जलमय झाले. अम्फानच्या दणक्याने अनेक घरांचे मोठे नुकसान झाले.
त्याशिवाय, झाडे उखडून पडण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या. बांगलादेशातील जीवितहानी प्रामुख्याने घरांच्या भिंती आणि झाडे अंगावर कोसळण्याच्या घटनांमुळे झाली. अम्फानने बुधवारी सायंकाळी 5 पासूून बांगलादेशची किनारपट्टी ओलांडली.
आता त्याची तीव्रता कमी झाल्याचे समजते. महाचक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा मिळाल्यानंतर बांगलादेशने आधीच किनारपट्टीलगतच्या सुमारे 20 लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले. तसेच, मदत आणि बचावकार्यासाठी लष्करही तैनात केले. याआधी 13 वर्षांपूर्वी बांगलादेशमध्ये सिद्र या चक्रीवादळाने थैमान घातले होते.
त्या वादळाने 2007 या वर्षी बांगलादेशात तब्बल 3 हजार 500 जणांचा बळी घेतला. त्या अनुभवामुळे यावेळी बांगलादेशातील यंत्रणांनी अम्फानचा मुकाबला करण्यासाठी पुरेशी तयारी केली होती.