कराड -शहरी भागासह परजिल्ह्यातून आलेल्या लोकांनी प्रशासनच्या सूचनांचे पालन करावे, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे. दरम्यान, म्हासोली, ता. कराड येथे भेट देऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली.
म्हासोली येथे चार दिवसात 12 जणांना करोनाची बाधा झाल्याने या गावातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्यासमवेत म्हासोली गावास भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव, तहसिलदार अमरदिप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख उपस्थित होत्या.
आरोग्य विभागासह पोलीस प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांनी म्हासोली येथे करण्यात आलेल्या उपायोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्थानिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. परजिल्ह्यातून आलेल्या लोकांसह स्थानिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. प्रशासन नियम मोडणाऱ्यांसह सुचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले.
तर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मुंबईसह परजिल्ह्यातून ग्रामीण भागात येणाऱ्या लोकांनी स्वत:हून होम क्वारंटाइन होणे आवश्यक आहे. अशा लोकांनी घर सोडल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दंडात्मक कारवाईनंतरही नियम मोडल्यास कराडला शासकीय क्वारंटाइन सेंटरमध्ये संबंधितांना हलवले जाणार आहे. तसेच करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आला असाल तर संबंधितांनी स्वत:हून तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहनही जिल्हाधिकऱ्यांनी केले आहे. यावेळी आरोग्य व पोलीस विभागाने केलेल्या कामांचे कौतूक जिल्हाधिकारी यांनी केले.