पुणे – महिनाभरपासून टोमॅटोचे भाव तेजीत आहेत. ते नियंत्रित करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, तरीही प्रत्यक्षात टोमॅटो दिवसागणिक महाग होत आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटोने 200 रुपये प्रतिकिलोचा आकडा गाठला आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य ग्राहकांनी टोमॅटो खरेदीकडे पाठ फिरविली आहे. तर, हॉटेल व्यावसायिकांना ग्रेव्ही, पावभाजी, सांबरसह विविध खाद्य पदार्थ बनविण्यासाठी टोमॅटो लागतोच. त्यामुळे त्यांचाकडून टोमॅटोची खरेदी करण्यात येत आहे.
अवघ्या दीड महिन्यांपूर्वी उत्पादन आणि आवक खूप झाल्याने टोमॅटोला कवडीमोल भाव मिळाला. त्यावेळी लागवड खर्च, वाहतूक खर्चही भरून न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. अनेकांनी टोमॅटो फेकून दिले. पण, आता उत्पादनही घटले असून, आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने भाव कडाडले आहेत. शुक्रवारी येथील बाजारात सुमारे साडेपाच ते सहा हजार पेटींची
आवक झाली. घाऊक बाजारात किलोला दर्जानुसार 60 ते 100 रुपये भाव मिळत आहे. येथील बाजारात पुणे विभागातून टोमॅटोची आवक होते आहे.
किरकोळ बाजारात टोमॅटो का आहेत महाग?
शहरात विविध किरकोळ बाजारात 160 ते 200 रुपये किलो भावाने टोमॅटोची विक्री होत आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात 18 ते 20 किलोचा कॅरेट खरेदी करावा लागतो. त्यातील 1 ते 2 किलो माल खराब निघण्याची शक्यता आहे. काही माल आकाराने लहान, दर्जाहिन असतो. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांना माल निवडून विकावा लागतो.
याबरोबरच खरेदी केलेल्या मालावर लेव्ही, 8 टक्के आडत द्यावी लागते. तसेच, खरेदी केलेला माल शहराच्या विविध भागात किरकोळ विक्रेते घेऊन जातात. त्याचा वाहतूक खर्च असतो. परिणामी, किरकोळ बाजारात घाऊकपेक्षा जास्त भावाने विक्री करावी लागते, असे मार्केट यार्डातील किरकोळ विक्रेते संघटनेचे प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.