मराठी रंगभूमीवर नाट्यछटा हा लेखन प्रकार रुजविणारे लेखक दिवाकर (शंकर काशिनाथ गर्गे) यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म पुणे येथे 18 जानेवारी 1889 रोजी झाला. दिवाकरांचे वडील राजेवाडी या ठिकाणी स्टेशनमास्तर होते. कालांतराने ते पुण्यास राहण्यास आले. दिवाकर हे त्यांचे दुसरे अपत्य होते.
दिवाकर अडीच वर्षांचे असताना त्यांना आजोळच्या आजीस (आईची आई) दत्तक देण्यात आले. मात्र, हे दत्तक विधान नाममात्र झाले होते. आपल्या बालपणी झालेल्या या दत्तक विधानाबद्दल दिवाकरांनी मोठेपणी नाखुशी व्यक्त केली होती. त्यांच्या चुलत्यांनाही हे दत्तक विधान पसंत नव्हते. शंकर काशिनाथ गर्गे हे दिवाकरांचे दत्तक घराण्यातले नाव होते.
दिवाकरांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. शाळेतील शालांत परीक्षा “स्कूल फायनल’ ते 1908 मध्ये उत्तीर्ण झाले. वर्ष 1910 मध्ये त्यांना फर्गसन कॉलेजातील इंग्रजीचे एक व्यासंगी प्राध्यापक वासुदेव बळवंत पटवर्धन यांचा सहवास मिळाला. त्यांच्याबरोबर इंग्रजी साहित्याचे वाचन आणि अध्ययन केले.
टॉलस्टॉय, इब्सेन, गॉल्झवर्दी, माटरलिंक, हाउप्टमान वगैरे युरोपीय लेखकांच्या वाङ्मयाचे वाचन त्यांनी केले. ब्राउनिंग, वर्डसवर्थ, शेक्सपिअर यांचा विशेष प्रभाव दिवाकरांच्या मनावर पडलेला होता. ब्राउनिंगच्या नाट्यात्मक एकभाषितांमुळे (ड्रॅमॅटिक मोनोलॉग) नाट्यछटा लिहिण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. दरम्यान, त्यांचा विवाह 24 जून 1910 रोजी कोल्हापूरच्या विष्णू नरसिंह पाठक यांची कन्या सखू यांच्याबरोबर झाला. चरितार्थासाठी या वेळी ते असिस्टंट सुपरिन्टेंडंट ऑफ पोलीस यांच्या कार्यालयात हजर झाले.
कालांतराने त्यांची बदली “डिस्ट्रिक्ट सुपरिन्टेंडंट ऑफ पोलीस’ यांच्या कार्यालयात झाली. यावेळी दिवाकरांचे डोळे बिघडल्यावर सिव्हिल सर्जन डॉ. हॅमिल्टन यांनी तपासणीनंतर सादर केलेल्या अहवालानुसार त्यांना सरकारी नोकरीत शारीरिकदृष्ट्या अपात्र ठरल्याने नोकरी सोडावी लागली. जून 1912 पासून दिवाकरांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या “डिप्रेस्ड क्लासेस मिशन’च्या सेंट्रल प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षक या पदावर नोकरी मिळाली. तेथे त्यांना मुख्याध्यापक पदापर्यंत बढती मिळाली.
कालांतराने नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून त्यांनी काम स्वीकारले. मार्च 1916 मध्ये ते एसटीसी परीक्षा पास झाले. नूतन मराठी विद्यालयात त्यांनी प्रथमच इंग्रजी हा विषय शिकवायला सुरुवात केली. त्यांनी उत्तम इंग्रजी शिक्षक असा लौकिक प्राप्त केला. सहकाऱ्यांच्या मदतीने दिवाकरांनी लवकरच प्रत्यक्ष पद्धतीने इंग्रजी शिकवण्यात कौशल्य हस्तगत केले आणि उत्तम इंग्रजी शिक्षक असा लौकिक प्राप्त केला.
नोकरी सुरू असतानाच त्यांचे लेखन सुरू झाले. “महासर्प’ ही त्यांनी लिहिलेली पहिली नाट्यछटा होय. त्यांच्या साहित्यसंपदेमध्ये एकूण 51 नाट्यछटा लिहिलेल्या आहेत. “मग तो दिवा कोणता’, “वर्डस्वर्थचे फुलपाखरूं’, “चिंगी महिन्याची झाली नाही तोच’, “शिवी कोणा देऊ नये’, “फाटलेला पतंग’ इ. त्यांच्या विशेष गाजलेल्या नाट्यछटा आहेत. त्यांनी त्यांचे सर्व लिखाण दिवाकर या नावाने प्रसिद्ध केले. त्यांनी जीवनविषयक खोल आशय ध्वनित करणारे प्रसंग त्यांच्या नाट्यछटांमध्ये साकारले. पुणे येथे 1 ऑक्टोबर, 1931 रोजी त्यांचे निधन झाले.