“महाराष्ट्र गंधर्व’ म्हणून ओळखले जाणारे सुरेश विनायक हळदणकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांची निश्चित जन्मतारीख उपलब्ध नाही. त्यांचा जन्म गोव्यामध्ये पणजी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गोव्याला पोर्तुगीज भाषेत झाले. गोव्यातील रसिक भजनी मंडळात त्यांनी गायनाचे प्राथमिक धडे घेतले.
त्यांचे मूळ नाव अमृत हळदणकर होते. महेश संगीत नाटक मंडळीसाठी बाळासाहेब खासगीवाले सुरेल आवाजात गाऊ शकतील अशी मुले शोधत होते. गोमंतकातील भजनीमंडळांच्या खाणीमध्ये हा 17 वर्षांचा गानहिरा त्यांना सापडला. त्याच्यावर पैलू पाडले व त्याचे सुरेश (सुरांचा ईश) असे नामकरण केले. त्यानंतर हळदणकर खासगीवाल्यांच्या कंपनीतून संगीत नाटकांत काम करू लागले. या कंपनीतील बापूराव केतकर आणि प्रख्यात हार्मोनिअमवादक पं. गोविंदराव टेंबे यांनी त्यांना शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताचे धडे दिले. गोविंदराव टेंबे यांनी त्यांना भाऊराव कोल्हटकर यांच्या ढंगदार गायकीचे प्रकार शिकविले.
महेश संगीत नाटक मंडळी कंपनी बंद झाल्यावर मुंबईत मास्टर मनोहर बर्वे यांच्याकडे त्यांची तालीम सुरू झाली. त्यावेळी पं. राम मराठे हेसुद्धा बर्वे यांच्याकडे शिकत होते. एचएमव्ही ध्वनिमुद्रण कंपनीचे जी. एन. जोशी यांनी त्यांची पहिली जाहीर मैफल घडवून आणली. त्यामुळे मुंबईतील संगीत क्षेत्रात त्यांचे नाव सर्वत्र झाले. गणेशोत्सवातून त्यांचे कार्यक्रम होऊ लागले. कालांतराने जगन्नाथबुवा पुरोहित व गणपतराव देवासकर, मोहनराव पालेकर (जयपूर), अन्वर हुसेन खॉं (आग्रा) यांच्याकडूनही त्यांना तालीम मिळाली.
सुरेश हळदणकरांनी मोजक्याच संगीत नाटकांतून भूमिका केल्या. आवाजातील गोडवा, आवाजाची उंच पट्टी व गाण्याचा आकर्षक ढंगामुळे रंगभूमीवरील त्यांचे गाणे प्रेक्षकांना आवडू लागले. वर्ष 1947-48 मध्ये त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी गंधर्व कंपनीच्या “सौभद्र’ या नाटकात नारदाची भूमिका केली. “राधाधर मधुमिलिंद’, “पावना वामना’ ही गाणी खूप लोकप्रिय झाली होती. वर्ष 1954 मध्ये चिंतामणी यशवंत मराठे यांच्या “होनाजी बाळा’ या नाटकामुळे त्यांच्या कारकिर्दीवर खरा साज चढला. या वेळी त्यांनी होनाजी यांची भूमिका केली होती व हेमंत केदार यांनी संगीत दिले होते.
हा प्रयोग आचार्य अत्रे यांनी पाहिला व त्यांना “महाराष्ट्र गंधर्व’ ही पदवी दिली. त्यानंतर मराठी रंगभूमीवर गायक-नट म्हणून त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. “सुरसुखखनी तू विमला’, “विमल अधर’, “गोविंदा रे गोपाळा’, “पद्मनाभा नारायणा’, “श्रीरंगा कमलाकांता’, “मानिली आपुली’, “सुकांत चंद्रानना’ इत्यादी नाट्यपदांच्या ध्वनिमुद्रिका खूपच लोकप्रिय झाल्या. नाटकांमधून निवृत्ती घेतल्यावर त्यांनी संगीत विद्यालय सुरू केले.
महाराष्ट्र राज्य शासनाचा “बालगंधर्व’ पुरस्कार, गोमंतक कला अकादमीतर्फे “लता मंगेशकर’ पुरस्कार, अ. भा. नाट्यपरिषदेचा “बालगंधर्व’ पुरस्कार, असे विविध पुरस्कार प्राप्त झाले. तसेच पंडित नेहरूंच्या हस्ते त्यांना “सुवर्णपदक’ देऊन गौरविण्यात आले. गोवा स्वतंत्र झाल्यावर पहिले राष्ट्रगीत म्हणण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांचे मुंबई येथे 17 जानेवारी 2000 रोजी निधन झाले.