मंचर – आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील माळीण येथील दुर्घटनेला रविवारी (दि. 30) 9 वर्ष पूर्ण झाले.या स्मृतिदिनानिमित्त ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मृतांच्या आठवणीने कुटुंबातील मुली, मुले व नातेवाइक यांचे हृदय गहिवरून आले.
दुर्घटना झालेल्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाला पुणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर, बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, प्रकाश घोलप, सोमनाथ काळे, मच्छिद्रं झांजरे, हेमंत एरंडे, भरत मोरे, माळीणचे संरपंच रघुनाथ झांजरे, दिंगाबर भालचिम आदी उपस्थित होते. यावेळी 151 मृतांना सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
विवेक वळसे पाटील म्हणाले की, दुर्घटनेवेळी तालुक्यातील सर्व सहकरी संस्थांनी मानवतेच्या दुष्टीकोनातून मदत करत येथील लोकांना धिर देण्याचे काम केले. तसेच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मदत व पुनर्वसनाच्या माळीण कामासाठी आजपर्यंत निधी कमी पडला नाही. यामुळे कमी कालावधीत पुनर्वसनाचे कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजून माळीण ग्रामस्थांनी सुचवलेली कामे पूर्ण करण्यात येतील. आम्ही माळीणवासीयांच्या मागे भक्कमपणे उभे आहोत.
माळीणसाठी केलेल्या मदत कार्यात कोणतीही तक्रार ग्रामस्थांकडून व इतर कोणाकडून आलेली नाही ही बाब प्रशासनासाठी कौतुकस्पद आहे. माळीण पुनर्वसनासाठी कोट्यवधी रुपयांची मदत मिळाली असून सामाजिक संस्थांचा हातभार लागल्याने घरांची कामे पूर्ण झाले आहे. यावेळी आलेल्या मान्यवरांनी नवव्या स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली वाहिली. माळीण येथे स्मृतीस्तंभा जवळ मृतांच्या आत्म्याला श्रद्धांजली वाहताना महिला व मुलीचे हृदय भरून आलेले दिसत होते. यावेळी अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन सध्याच्या नवीन कामाबाबत काही मागण्या व आपली मते देवराम झांजरे, सुहास झांजरे यांनी व्यक्त केली.
इर्शाळवाडीकरांना करणार मदत
मानवतेच्या दृष्टीकोनातून रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील नागरिकांना माळीणवासियांकडून काहीनाकाही मदत म्हणून मदत करण्याचा ग्रामस्थांचा मानस असून 21 हजार रुपयांची मदत इर्शाळवाडीत जाऊन करणार असल्याचे मच्छिंद्र झांजरे व संजय झांजरे यांनी सांगितले.
या आहेत मागण्या
* स्मृतीवनातील स्तंभ खराब होऊ नये म्हणून पत्राशेडचा मोठा सभामंडप बांधून मिळावा
* पुनर्वसन माळीण गावठाणाच्या घरांच्या गळतीची दुरुस्तीची कामे लवकर पूर्ण करावीत
* माळीण गावाला पिण्याच्या पाण्याची असणारी गैरसोय दूर करावी