मराठी रंगभूमीवरील प्रख्यात नट आणि नाट्यशिक्षक, केशवराव त्र्यंबक दाते यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील अडिवरे या गावी 24 सप्टेंबर 1889 रोजी झाला. केशवराव अवघे पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. जेमतेम इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत शिक्षण झाल्यानंतर चरितार्थासाठी त्यांनी मुंबई गाठली व तेथे सुरुवातीला एका दवाखान्यात कंपाउंडर म्हणून काम केले.
त्यावेळी संगीत नाटकांचा बोलबाला होता. त्या काळात महाराष्ट्र नाटक मंडळींची काही नाटके त्यांनी पाहिली. नाट्यसृष्टीबद्दलचे आकर्षण वाढू लागले आणि रंगभूमीवर नट होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात निर्माण झाली. एका ओळखीच्या मध्यस्थीने त्यांनी 20 मे 1907 रोजी महाराष्ट्र नाटक मंडळीत प्रवेश मिळवला. त्यावेळी स्त्रीपात्र पुरुषच करायचे. एका नाट्यसंस्थेच्या “झुंजारराव’ नाटकातील “सारजे’ची भूमिका त्यांना मिळाली व हीच केशवरावांची पहिली भूमिका ठरली.
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे “कीचक वध’ हे नाटक रंगभूमीवर वर्ष 1907 मधे आले. गणपतराव भागवत यांच्या कीचकाच्या भूमिकेमुळे हे नाटक खूपच गाजले होते. कीचकाची पत्नी रत्नप्रभा, हिची भूमिका करण्याची संधी केशवरावांना वर्ष 1908 मध्ये लाभली. गणपतराव भागवत यांच्या अभिनय कौशल्याचे त्यांना जवळून निरीक्षण करता आले. नाट्यअभिनेत्याला आपल्या भूमिकेशी कसे समरस व्हायचे याचे धडे त्यांना गणपतरावांच्या अभिनयातूनच मिळाले. नटाच्या जीवनात शिस्त आणि चारित्र्याचे महत्त्वही त्यांना कळले व त्यातूनच त्यांनी एक आदर्श नट उभा केला आणि नवोदितांना ते मार्गदर्शनही करू लागले.
महाराष्ट्र नाटक मंडळीच्या नाटकात केशवरावांनी काही स्त्रीभूमिका केल्यानंतर ते नायकाची भूमिका करू लागले. “प्रेमसंन्यास’ नाटकातील जयंत, “सत्वपरीक्षा’ नाटकातील हरिश्चंद्र, “पुण्यप्रभाव’ नाटकातील वृंदावन आणि “विचित्रलीला’ नाटकातील विचित्र अशा त्यांनी काही ठळक भूमिका वठविल्या होत्या. वर्ष 1919 मधे केशवराव महाराष्ट्र नाटक मंडळीचे एक भागीदार झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत “बेबंदशाही’ नाटकातील “गणोजी शिर्के’, “खडाष्टक’ नाटकातील कवीश्वर व “सवतीमत्सर’ नाटकातील राम या भूमिका उत्कृष्टरीतीने वटविल्या. महाराष्ट्र नाटक मंडळीच्या भागीदारीतून निवृत्त झाल्यानंतर समर्थ नाटक मंडळी व नाट्यमन्वंतर या संस्थांच्या नाटकांत त्यांनी भूमिका केल्या.
समर्थ नाटक मंडळीच्या “आग्र्याहून सुटका’ या नाटकातील “औरंगजेब’ आणि नाट्यमन्वंतराच्या “आंधळ्यांची शाळा’ या नाटकातील “मनोहर’ या भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडल्या. केशवरावांनी रंगभूमीचे नाट्यशिक्षक म्हणूनही नाव कमावले. बोलपटांच्या आगमनानंतर केशवरावांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. प्रभात फिल्म कंपनीच्या अमृतमंथन, कुंकू आणि शेजारी या चित्रपटांत तसेच बाबूराव पेंटर यांच्या सावकारी पाश या चित्रपटात त्यांनी प्रभावी भूमिका केल्या. राजकमलच्या “झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटातील त्यांची भूमिका लोकप्रिय झाली होती.
व्ही. शांताराम यांच्या राजकमल कलामंदिरात त्यांचे सहकारी आणि सल्लागार म्हणून केशवराव यांनी जबाबदारी पार पाडली होती.
केशवराव चित्रपटसृष्टीत असतानाही त्यांचे नाट्यसृष्टीकडेही लक्ष होते. त्यांनी दिग्दर्शन केलेल्या “भाऊबंदकी’ नाटकाला भारताच्या राजधानीत पहिले पारितोषिक मिळाले. त्यांना 1964 साली संगीत नाटक अकादमीचे राष्ट्रपतिपदक मिळाले. केशवरावांचा विवाह रमाबाई यांच्याबरोबर 1917 साली झाला. आपल्या सुखी आणि नेटक्या संसाराचे सारे श्रेय केशवराव रमाबाईंना देत असत. रमाबाईंचे 30 जानेवारी 1968 रोजी निधन झाले. त्यानंतर 3 वर्षांनी 13 सप्टेंबर 1971 रोजी त्यांनीही जगाचा निरोप घेतला.