मुंबई: हिंगणघाट येथील घटना महाराष्ट्रासाठी अश्लाघ्य आहे. विकृत हल्ल्यात जखमी भगिनीची मृत्युशी झुंज अखेर आज संपली. उपचारांचीही शर्थ, पण काळाचा घाला. या भगिनीचे कुटुंबीय व दारोडा गावातील लोकांची मानसिक अवस्था आपण समजू शकतो, अशी शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, “आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल. या खटल्याचा पाठपुरावा करुन, तो लवकरात लवकर निकाली काढू. अनेकदा खटला लांब चालतो. निकाल लागल्यानंतरही अंमलबजावणीसाठी वेळ लागतो. मी तसं होऊ देणार नाही, लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राला पुरोगामी परंपरा असून माता-भगिनींचा सन्मान करणारा प्रदेश म्हणून आपली ओळख आहे. या प्रतिमेला तडा देणाऱ्या या गोष्टींना कदापिही खपवून घेतले जाणार नाही. स्त्री-सन्मानाच्या आपल्या संस्कृतीची घरा-घरात उजळणी करावी लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील संतप्त प्रतिक्रिया
हिंगणघाटमध्ये पेट्रोल ओतून जाळण्यात आलेल्या शिक्षिकेचा झालेला मृत्यू ही लाजिरवाणी घटना. आरोपीला त्याच्या कृत्याची शिक्षा लवकर मिळेल, ती इतरांवर जरब बसवणारी असेल. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील राहील. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे. आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्ल्यातील मृत बहिणीला खरी श्रद्धांजली असेल, असे अजित पवार म्हणाले.