उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचे सीएएवर व्यक्त केले मत
नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सुरू झालेला वाद काही केल्या शमण्याचे नाव घेत नाही त्यातच भारतातील काही लोकांना हिंदू शब्दाची ऍलर्जी आहे. एखाद्या विशिष्ट धर्माचा अपमान करणे असा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ होत नाही, असे मत देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. सुधारित नागरिकत्व काद्याबद्दल बोलताना नायडू यांनी हे मत व्यक्त केले आहे. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त नायडू चेन्नईमधील श्री रामकृष्ठ मठद्वारे आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते.
विशेष कार्यक्रमामध्ये नायडू यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबद्दल आपली मते मांडली. काही लोकांना हिंदू शब्दाची ऍलर्जी आहे असे वाटते. हे योग्य नाही. मात्र त्यांना त्यांचा दृष्टीकोन ठेवण्याचा अधिकार आहे. एखाद्या धर्माचा तिरस्कार करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता असं समजता कामा नये. धर्मनिरपेक्षता देशाच्या संस्कृती जपण्यासाठी महत्वाची आहे, असे नायडू म्हणाले.
आपण हिंदू धर्माचे आहोत याचा स्वामी विवेकानंद यांना अभिमान होता. या धर्माने देशाला सहनशक्ती, सर्वांना स्वीकारण्याची शिकवण दिली. सर्व धर्मांचे अस्तित्व स्वीकारणारा हिंदू हा एकमेव धर्म आहे. हेच हिंदू धर्माचे मोठेपण आणि सौंदर्य आहे, असंही नायडू यावेळी म्हणाले. भारताने कायमच वेगवेगळ्या देशातील पिडीतांना आश्रय दिला आहे. स्वामी विवेकानंद हे थोर समाज सुधारक होते. त्यांनी खऱ्या अर्थाने पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख करुन दिली. एका भाषणामध्ये त्यांनी, इतर देशांनी छळ केलेल्यांना मोठ्या मनाने आश्रय देणाऱ्या देशातील मी नागरिक आहे, असे अभिमाने सांगितले होते हे आपण विसरता कामा नये,असेही नायडू यावेळी म्हणाले.