सेऊल, (दक्षिण कोरिया) – दक्षिण कोरियाशी संरक्षण भागीदारी वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियाच्या भेटीवर असताना जयशंकर यांनी दक्षिण कोरियातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि संरक्षण भागीदारी विषयक महत्वाच्या क्षेत्रांमधील नवीन तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर आणि हरित हायड्रोजन क्षेत्रातील सहकार्याच्या मुद्यावर चर्चा केली.
भारत-दक्षिण कोरिया दरम्यानच्या १०व्या संयुक्त कमिशनच्या बैठकीच्यावेळी त्यांनी दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो-ते वूल यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सहकार्याच्या मुद्दयावर दोन्ही बाजूंनी सर्वसमावेशक आणि विधायक चर्चा झाली, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विज्ञान, तंत्रज्ञान आणि संरक्षणाशिवाय उद्योग आणि व्यापार, लोकांमधील थेट आदान-प्रदान आणि सांस्कृतिक सहकार्याबद्दलही चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. भारत- दक्षिण कोरिया संयुक्त कमिशनच्या बैठकीला दोन्ही देशांमधील अनेक मंत्रालयांचे आणि विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीच्यावेळी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावाही घेण्यात आला, असे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.