मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हा आपला इतिहास आणि आपली परंपरा आहे. तो इतिहास टिकवणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. या गडकिल्ल्यांच्या संदर्भात प्राधिकरण महामंडळ स्थापन करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यभरातील शिवप्रेमींनी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आदोंलनकर्त्यांची एकनाथ शिंदे यांनी आज भेट घतली.
एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील गडकिल्ल्यांची फार दुरावस्था झाली आहे. काही किल्ले हे राज्य सरकारच्या अंतर्गत आहेत तर काही किल्ले हे केंद्र सरकारच्या अंतर्गत आहेत. या सगळ्यांची माहिती घेऊन हे किल्ले कसे जतन केले जातील यासंदर्भात लवकरच महामंडळा संदर्भात निर्णय घेतला जाईल. महामंडळ स्थापन केल्यानंतर त्या गडकिल्ल्यांच्या आजूबाजूचा परिसर हा देखील कशा प्रकारे जतन केला जाईल, यासाठी देखील काम केले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हा आपला इतिहास आणि आपली परंपरा आहे. त्यामुळे तुमची काही मागणी आहे ती नक्की विचार करण्यासारखी आहे. लवकरच या किल्ल्यांच्या संदर्भात प्राधिकरण महामंडळ स्थापन करून आजपासूनच मी काम करण्याच्या सूचना देत आहे. हे सरकार किती जलद गतीने काम करत आहे हे आता आपल्या लक्षात आले असेल. मी तातडीने या संदर्भात प्रक्रिया करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दुर्गा मित्रांची नेमणूक करू –
लवकरच दुर्गा मित्र म्हणून आपण नवीन संकल्पना सुरू करणार आहोत. जेणेकरून गड-किल्ल्यांच्या आसपासच्या परिसरातील तरुणांना मदत होईल आणि त्यांना देखील आपण शासनाच्या वतीने मदत करू. त्यामुळे या गडकिल्ल्यांच्या संदर्भात तातडीने काम करण्याच्या सूचना मी संबंधित विभागांना देत आहे, असे त्यांनी यावेळी आंदोलकांना आश्वसान दिले.