कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपमध्ये सामील झाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीतील शानदार विजयानंतर तृणमूल काँग्रेसनं भाजपला जोरदार धक्का देत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांना तृणमूलमध्ये परत घेतलं. घरवापसी करताच त्यांनी गृहमंत्रालयाला पत्र लिहले आहे.
भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी करणाऱ्या मुकूल रॉय यांनी केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेली सुरक्षा परत घेण्यास सांगितले आहे. रॉय यांनी यासंदर्भात अमित शाह यांच्या अखत्यारित असलेल्या गृहमंत्रालयाला पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेली सुरक्षाव्यवस्था परत घ्यावी, असे म्हटले आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुकूल रॉय यांना केंद्र सरकारकडून सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, अमित शाह यांच्या अखत्यारित असणाऱ्या केंद्रीय गृहमंत्रालयाने अद्याप या पत्राला कोणतेही उत्तर दिलेले नाही.
TMC leader Mukul Roy writes to the Ministry of Home Affairs for withdrawal of his Central security cover. MHA is yet to respond to the request: Sources
(file pic) pic.twitter.com/O2tzTVZxjZ
— ANI (@ANI) June 12, 2021
मुकूल रॉय यांनी चार वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर मुकूल रॉय आणि त्यांचे पूत्र शुभ्रांशु रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी केली. मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकूल रॉय यांनी शुक्रवारी मुलासह घरवापसी केली आहे.