आरोग्य वार्ता – आपले शरीर हे तीन दोषांनी (त्रिदोष) मिळून बनलेल आहे. वात, पित्त आणि कफ हे ते दोष. पित्त हे अग्नी आणि जल तत्वापासून बनलेलं आहे. पित्त आपल्या शरीरात ज्या भागात तयार होता किंवा साठवलं जातं त्याला पित्ताशय अस म्हणतात. अष्टांगहृदय या ग्रंथामध्ये वाग्भट ऋषींनी पित्ताच्या सात गुणांचे वर्णन केले आहे:
पित्तं सस्नेह तीक्ष्णोष्ण लघू विस्त्रं सरं द्रवम असे ते सूत्र आहे. म्हणजेच पित्त हे किंचित तैलीय, भेदक, उष्ण, हलके, सुगंधी, प्रवाही आणि जलरूपी असते. पित्तामुळे चयापचय क्रियेला किंवा परिवर्तनाला चालना मिळते. पित्त पचन, शरीराचे तापमान स्थिर राखणे, दृष्टीय आकलन, त्वचेचा रंग आणि वर्ण, बुद्धी आणि भावना नियंत्रित करते. पित्त दोषात असमतोल झाल्यास शारीरिक अनारोग्य, आजार आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात.
पित्त होण्याची कारणे
1)पित्त वाढविणाऱ्या अन्नाचे सेवन (तिखट, आंबट, खारट, मसालेदार, तेलकट, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि लाल मांस)
2) कॉफी, ब्लॅक टी, निकोटीन (धूम्रपान),
3) अल्कोहोल आणि इतर मादक पदार्थ
4) उन्हात सतत वास्तव्य
5) भावनिक ताण
पित्तदोषाची लक्षणे
भूक आणि तहान वाढणे, केस पांढरे होणे / गळणे, चक्कर येणे आणि अर्धशिशी, अचानक भयंकर उष्णता जाणवणे, श्वासाला आणि शरीराला दुर्गंधी येणे, घश्याला सतत कोरड पडणे, जेवणाची वेळ निघून गेल्यास मळमळ वाटणे, निद्रानाश, मासिक पाळी मधे प्रचंड वेदना होणे.
पित्तदोषाचे मानसिक बदल
निराशा, अहंकारात वाढ, अति ध्येयवादी बनणे, संताप, मत्सर, अस्थिर वर्तन
पित्तामुळे होणारे आजार
छातीत जळजळणे, उन्हाने त्वचेचा क्षोभ, इसब, मुरूम, त्वचेचे रोग, आम्लदाह, पोटातील व्रण, ताप रक्तात गुठळ्या आणि पक्षाघात, मुत्रपिंडाचा संसर्ग, थायरॉइड ग्रंथीचे विकार, कावीळ, सांधेदुखी (आमवात), अतिसार, सतत थकवा जाणवणे, अंधुकदृष्टी किंवा आंधळेपणा, रोगप्रतिकार शक्ती कमी असणे आणि नैराश्य पित्त दोषाच्या शरीरातील समतोलामुळे ध्येय आणि उद्देश साध्य करण्यास प्रेरणा मिळते, एकाग्रता वाढते, समस्येचे निराकरण करण्याची क्षमता वाढते आणि आत्मविश्वास वाढतो.
पित्तदोषावर घरगुती उपाय
आहार – पित्त दोष संतुलित ठेवण्यासाठी आहारात तूप, लोणी आणि दुधाचा समावेश करा. पित्त असंतुलित असेल किंवा वाढलं असेल तर, आंबट फळं खाणं टाळा. ते संतुलित करण्यासाठी गोड फळांचे सेवन करा. पित्त दोष शांत करण्यासाठी कोरफड, व्हीटग्रासचा रस पिऊ शकता. किंवा दुधीचा रस देखील उपयुक्त आहे. पित्ताचे प्रमाण आवळ्याच्या रसानेही संतुलित करता येते.
पित्तदोषामुळे शरीरातील अग्नीचे प्रमाण वाढते, अशा स्थितीत भरपूर पाणी प्यायल्याने ते शांत होऊ शकते. पित्तदोष संतुलित करण्यासाठी आपण गुलकंद खाऊ शकता. याचा कूलिंग इफेक्ट आहे, ज्यामुळे शरीरातील आग शांत होते.
शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढले की, आपण बडीशेप, व धणे मिक्स करून पाणी पिऊ शकता. यासाठी रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप आणि धणे मिसळून भिजत ठेवा, व सकाळी त्याचे पाणी प्या.
पित्त दोष संतुलित करण्यासाठी पुदिन्याचे पाणी देखील उपयुक्त आहे. मनुका पित्त दोष शांत करण्यास मदत करते. दुधात मनुके टाकून खा.
भाज्यांमध्ये काकडी, कोबी,कोथिंबीर, कडधान्य, पालेभाज्या, सोयाबीन आणि दुधीचा समावेश करा. ज्या भाज्या अल्कलीन आहेत, त्यांचा वापर आहारात करावा. मधुर (गोड), तिक्त (कडू), कषाय (तुरट)या रसांनी युक्त पदार्थांचा समावेश करावा.
योग्य समन्वय
कार्यशीलता आणि विश्रांती ह्यात योग्य समन्वय साधा. कामातच फार गुंतून राहू नका किंवा खूप लोळणे टाळा. चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्या, नियमित आहार घ्या आणि चांगल्या संगतीत आणि निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा. ध्यान धारणा करा आणि कृतज्ञ रहा. ध्यान करा आणि आपल्या पित्त प्रकृतीच्या भरकटणाऱ्या मनाला स्थिर करा. तसेच तुम्हाला लाभलेल्या सर्व गोष्टींबद्दल कृतज्ञ भाव ठेवा.
योग करा
खालील योगासने पित्ताच्या असमतोलाचा प्रभाव कमी करण्यास मदतीची ठरतात.
मार्जारासन, शिशू आसन, उत्कटासन, भुजंगासन, पश्चिमोत्तानासन, अर्धनौकासन, अर्धसर्वांगासन, सेतूबंधासन, शवासन आणि प्राणायाम
आयुर्वेदिक औषधे
पित्ताचा समतोल साधणारी आयुर्वेदिक औषधे अशी आहेत. अम्ल पित्तादि वटी, अविपत्तिकर चूर्ण, ज्येष्ठमध आणि प्रवाळ पंचामृत ही औषधे शमन चिकित्सा करणारी आहेत. म्हणजे यामुळे पित्तदोष शरिरातच शमन केला जातो.