पुणे -तुम्ही जर अंत्योदय योजनेचे लाभार्थी असाल अन् तुम्हाला या योजनेतून स्वस्त धान्याचा लाभ घ्यायचा असेल तर आधार व रेशन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. अन्यथा या योजनेच्या लाभाला शिधापत्रिकाधारकांना मुकावे लागणार आहे. दरम्यान, रेशन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. यापूर्वी ही मुदत 30 जूनपर्यंत होती.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे सरकारने आवश्यक केले आहे. रेशन कार्ड लिंक केले तरच पात्र कुटुंबाला अनुदानित दरात धान्य खरेदीचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वी सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले होते. आता त्यात रेशनकार्डचाही समावेश करण्यात आला आहे.
जोडणे का आवश्यक?
जी कुटुंबे अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन दुकानांत स्वस्त धान्याचा लाभ घेत आहेत, त्यांच्यासाठी रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. सरकारला दोन्ही कार्डे लिंक करायची आहेत, जेणे करून लोकांना एकापेक्षा जास्त शिधापत्रिका घेण्यापासून रोखता येईल आणि गरिबांची ओळख पटवून रेशन सहज पोहोचवता येईल. जर तुम्ही वेळेत रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केले तर तुम्हाला त्यासाठी रुपयाही देण्याची गरज नाही. लिंक करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जावे लागेल.
रेशन कार्डचे फायदे…
- रेशन दुकानातून अन्नधान्य सवलतीच्या दरात उपलब्ध असते.
- रेशनकार्ड भारतातील अधिकृत ओळखपत्र म्हणून ओळखले जाते.
- पॅनकार्डसाठी अर्ज करताना हा ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येतो.
- बॅंक खाते उघडण्यासाठी आणि बॅंक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यासाठी उपयोग.
- मतदार ओळखपत्रासाठी आवश्यक.
- या कार्डद्वारे तुम्ही मोबाइलचे सिम कार्ड देखील खरेदी करू शकता.
- पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी देखील हे कार्ड ग्राह्य धरले जाते.
- ड्रायव्हिंग लायसन्स, गॅस कनेक्शनसाठी तुम्ही हे कार्ड वापरू शकता.