नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांत भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी ज्या धमक्यांच्या भाषेचा वापर केला आहे तो पहाता भाजपने सुसंस्कृत राजकारणाला तिलांजली दिली आहे असेच दिसते आहे अशी टीका ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, खासदार परवेश वर्मा आणि पक्षाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी वापरलेली भाषा ऐकल्यानंतर वास्तविक भाजप प्रमुखांनी त्यांना त्याबद्दल तंबी देणे अपेक्षित होते पण तसे होताना दिसत नाही. दिल्लीत त्यांचा पराभव निश्चीत असल्यानेच त्यांच्याकडून अशा भाषेचा वापर सुरू झाला असावा असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.
अशा बेजबाबदार भाषेचा वापर करणाऱ्या भाजप नेत्यांना पंतप्रधान मोदी यांच्याकडूनही ताकिद दिली जाणे अपेक्षित आहे असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या नेत्यांनी सीएए विरोधात आंदोलने करणाऱ्या नेत्यांच्या व निदर्शकांच्या विरोधात अत्यंत हीन भाषेत टीका केली आहे. त्यावरून वादंग निर्माण झाले असतानाच आज कर्नाटकचे पर्यटन मंत्री रवी यांनीही सीएएविरोधात निदर्शने करणारे देशद्रोही असून त्यांना बिर्याणी नव्हे तर गोळ्याच घातल्या पाहिजेत असे वक्तव्य केले आहे. या पार्श्वभूमीवर चिदंबरम यांनी हे टीकास्त्र सोडले आहे.