निवडणूक आयोगाने दखल घेण्याची मागणी
नवी दिल्ली :राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) रॅलीत भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप कॉंग्रेसने बुधवारी केला. तसेच, निवडणूक आयोगाने संबंधित घडामोडीची दखल घ्यावी, अशी मागणीही केली.
दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. अशातच मंगळवारी मोदींनी एनसीसीच्या रॅलीत भाषण केले. त्यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी आक्षेप घेतला. युवा मनावर चटकन परिणाम होईल अशाप्रकारची भूमिका मोदींनी मांडली. पंतप्रधानपद भुषवणाऱ्या व्यक्तीला ते शोभणारे नाही. पंतप्रधान असल्याने मोदींनी नियमांचा भंग करू नये.
ते निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा भंग करू शकत नाहीत, असे चव्हाण यांनी म्हटले. पुढे बोलताना त्यांनी आयोगाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एनसीसी रॅलीतील भाषणात मोदी यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याचे (का) समर्थन केले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाच्या समस्येवर त्यांनी भाष्य केले. तसेच, भारताच्या विरोधात तीन युद्धांमध्ये पराभूत व्हावे लागल्यानंतरही पाकिस्तान छुपे युद्ध करत असल्याची टीकाही त्यांनी केली.