- कर्जत : आदिवासी पाड्यातील महिलांनी श्रमदानातून रस्ता केला खड्डेमुक्त
- भागूचीवाडीच्या 70 वर्षांच्या आजीचा सहभाग
कर्जत : कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील भागूचीवाडी या आदिवासी वाडीमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही, सुमारे 600 मीटरचा पूर्ण चढावाचा कच्चा रस्ता वन जमिनीमधून करण्यात आला आहे, पावसाळ्यात या रस्त्यावरील माती वाहून जाऊन रस्ता खड्डेमय झाला होता. संपूर्ण रस्त्यावर दगड पसरले असल्याने रस्त्याने पाण्याचे भरलेले हांडे घेऊन घरी जाताना महिलांचे हाल होतात. काहीवेळेस पाय घसरून डोक्यावरील भरलेले हंड्यासह महिला पडतात. दररोजची अडचण दूर वाडीमधील महिलांनी रस्त्यावरील दगड बाजूला करून खड्डेमुक्त रस्ता करण्याचा निर्णय घेतला, त्यात लहान मुलींपासून 70 वर्षांच्या आजीबाईंचा समावेश आहे. सुमारे 100 महिलांनी घराची कामे बाजूला ठेवून रस्त्यासाठी दोन दिवस श्रमदान करीत 600 मीटर पूर्ण चढावाचा रस्ता तयार झाला आहे.
कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीतील भागूचीवाडी ही आदिवासी वस्ती मुरबाड-कर्जत रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगरावर वसली आहे.सुमारे 70 घरांची वस्ती असलेल्या या वाडीच्या आजूबाजूला वन विभागाच्या मालकीची जमीन आहे. त्यामुळे वाडीमध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता बनविता येत नव्हता. त्यात आणखी अडचणीची गोष्ट म्हणजे वाडीमधील आदिवासी रहिवासी यांना पाणी नेण्यासाठी डोंगराच्या पायथ्याला यावे लागते.
वर्षेनुवर्षे ही स्थिती आदिवासी लोकांची असल्याने या वाडीमध्ये बाहेरच्या वाडीमधील मुली विवाह करून यायला तयार नसत. भागूचीवाडीमध्ये विवाह होऊन आलेल्या सर्व महिलांना डोक्यावरून पाणी नेताना या महिलांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. साधारण 600 मीटरचा तीव्र चढाव आणि त्यानंतर 100 मीटरवर असलेल्या बोअरवेलमधून पाणी भरून पुन्हा डोंगर चढण्याचे काम आदिवासी महिलांना दररोज करावे लागत आहे. त्यावेळी रस्त्यावर टाकलेली खडी यावरून महिलांचे पाय घसरून अनेक महिला पाण्याने भरलेल्या हंड्यासह पडल्या आहेत.
पाणी वाहून नेणाऱ्या महिला या दिवसभर हेच काम करीत असल्याने आपल्याला होणारे अपघात कमी व्हावेत यासाठी भागूचीवाडीमधील आणीबाई दामा ढोले, छबी गणपत निरगुडा, माली रामा निरगुडा, पिली आलो निरगुडा, सखू बांगारे या महिलांनी आपले कष्ट कमी करण्यासाठी आपणच काही केले पाहिजे, यासाठी वाडीमध्ये घरोघरी फिरून आपल्याला रस्त्यामुळे होणारे कष्ट कमी करण्यासाठी श्रमदान करायचे आहे आणि आपण महिला एकत्र येऊन हे काम करू हे सर्व आबालवृद्ध महिलांना पटवून दिले.
मग काय फक्त महिला एकत्र येऊन तीव्र चढावाचा 600 मीटरच्या रस्त्यासाठी श्रमदान सुरू झाले. भागूचीवाडीमधील मुली, महिला तसेच 70 वर्षांच्या आजीसह साधारण 100 जणींनी सकाळी रस्त्याचे काम करण्यासाठी हातात टिकाव, फावडे आणि घमेल घेऊन उतरल्या. शेतीवर गेल्यानंतर ज्याप्रमाणे काम करतो, त्या पद्धतीने या महिला सोबत चटणी-भाकरी घेऊन आल्या होत्या.दुपारी जेवण देखील रस्त्यावर बसून या महिलांनी एकत्र केले. कोणत्याही पुरुषाची मदत न घेता या महिला टिकावच्या डोंगर फोडून माती काढत होत्या.
काही महिला ती माती घमेल्यात भरून रस्त्यावर पसरवत होत्या. यात आपण आपल्या लेकी-सुनांच्या मागे उभे राहायला हवे, यासाठी 50-70 वर्षांच्या वयोगटातील आजीबाई या रस्त्यातील दगड सर्वात पुढे राहून गोळा करीत होता. असे दरमजल करीत भागूचीवाडी मधील महिलांनी दीड दिवसात हा रस्ता श्रमदान करून दगडमुक्त करीत त्यावर माती टाकण्याचे काम केल्याने भागूचीवाडीचा रस्ता नव्याने सजला आहे.
या कार्यात आशा शंकर पिंगळे, भविका बिजी निरगुडा, पद्मा मंगल निरगुडा, ताई पाळू पारधी, माधुरी भगवान, मनीषा विलास ठोंबरे, करिषमा विलास ठोंबरे, अनिता रमेश पारधी, पद्मा निरगुडा, नंदा निरगुडा, आशा निरगुडा, संजना पारधी, सुनीता पारधी, मंदा ढोले, यमु निरगुडा, जानकी निरगुडा, अनिता श्रीराम पारधी यांच्यासारख्या असंख्य महिलांचे हात भागूचीवाडी रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी लागले आहेत.
महिलांच्या तोंडी आदिवासी गाणी
600 मीटर लांबीचा चढाव तीव्र असल्याने वाहने चढत नाहीत आणि महिलांना पाण्याचे हांडे नेताना त्रास होतो. त्यामुळे रस्ता बनविण्यासाठी महिला श्रमदान करीत होत्या, त्यावेळी या आदिवासी महिला आपल्या भाषेतून गाणी गाऊन आपले श्रम कमी करण्याचा प्रयत्न करीत होत्या. कडक आवाजात गाणी म्हणणाऱ्या महिला यांनी परिसरात काही तरी वेगळे सुरू आहे, असा भास करून देत होत्या.