अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांना कॅबिनेट तर दत्तात्रय भरणेंच्या राज्यमंत्रिपदावर जवळपास शिक्कामोर्तब
पुणे- महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होऊन महिना उलटून गेला तरी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला नव्हता. अखेर, शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची मंत्रिमंडळातील मंत्रिपदांची नावे जवळपास निश्चित झाली असून विस्तारासाठी सोमवार (दि. 30)चा मुहूर्त ठरला आहे. यात पुणे जिल्ह्यात तीन लालदिवे मिळण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. यात दोन कॅबिनेट, तर एक राज्यमंत्रीपद आहे.
यासाठी अनुक्रमे अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे यांच्या नावावार शिक्कामोर्तब झाले असले तरी शपथ घेतांना हीच तीन नावे असणार की यात आणखी वाढणार की एखादे नाव बदलणार हे सोमवारी शपथविधीच्या वेळी स्पष्ट होईलच. मात्र, तोपर्यंत “वेट ऍण्ड वॉच’ची भूमिका बजवावी लागणार आहे.
राज्यात भाजपचा वारू रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पाय रोवून उभे होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येत नव्हती. तर, शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून बसल्याने भाजपची “कोंडी’ झाली. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आयती संधी चालून आली आणि त्यांनी शिवसेनेच्या हाताला हात देत सत्तेत सहभागी झाले आणि राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे नवीन समिकरण जुळले आणि सत्ता स्थापन झाली.
मात्र, महिना उलटला तरी मंत्रिपदाचा विस्तार होत नव्हता. त्यामुळे जनतेसह विरोधीपक्षाने सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविला. अखेर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला सोमवारचा (दि. 30) मुहूर्त मिळाला आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील 21 मतदारसंघांपैकी बारामती सोडले तर त्यावेळी शिवसेना-भाजपची युती 20 जागा मिळवणारच, असा दावा केला जात होता.
मात्र, भाजपचा हा वारू रोखण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने जोरदार कंबर कसली आणि भाजपचा वारू तर रोखलाच शिवाय भाजपबरोबर गेल्याने शिवसेनेलाही मोठा फटका बसला अन् 21 पैकी एकाही मतदारसंघात शिवसेनेचा भगवा न फडकवता आल्याचे शल्य शिवसैनिकांना अद्यापही सलत असले तरी आता भाजपचा साथ जरी शिवसेनेने सोडला असला तरी राज्यमंत्रिमंडळात पराभूत उमेदवारांना संधी नकोची भूमिका शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक,
कार्यकर्त्यांनी घेतल्याने जिल्ह्यात शिवसेनेला पुन्हा मंत्रिपदाची हुलकावणी मिळाली असल्याचे संभाव्या यादीवरून जरी दिसत असले तरी जिल्ह्यातील शिवसैनिकांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जिल्ह्यातील काही शिवसैनिकांना महमंडळावर घेऊन त्यांचे पुनर्वसन नक्की करतील असा शिवसैनिकांना विश्वास आहे.
रात्रीत नावांची यादी बदलणे नवीन नाही!
राज्यमंत्रिमंडळ विस्ताराच्या संभाव्य यादीत जिल्ह्यातील बारामतीचे आमदार अजित पवार, आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांना अनुभवाच्या जोरावर तर धनगर समाजाचे एकमेव आमदार म्हणून इंदापूरचे दत्तात्रय भरणे आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करताना सर्व समाजाचा समतोल साधण्यासाठी भरणेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पाडली आहे. तर जिल्ह्याला तीनपेक्षा अधिक मंत्रिपदे मिळू शकणार नसल्याचे जरी खरे असले तरी सोमवारी कोण-कोण शपथ घेणार हे पाहणे औत्स्युक्याचे आहे. कारण, रात्रीत नावांची यादी बदलणे हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही.
अजित पवारच उपमुख्यमंत्री होणार?
भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसध्ये सूत जुळतच असतानाच अजित पवार यांनी भाजपशी घरोबा करीत राज्यात सरकार स्थापन करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र, हे सरकार 80 तासांमध्ये पडले आणि अजित पवार यांची घरवापसी झाली. हे बंड त्यांना महागात पडणार असल्याचे सुतोवाच दिले जात होते. तर मुंबईतील उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचे वाटप न झाल्याने “गुढ’ वाढले होते. त्यातच सिंचन घोटाळ्यात पवारांना क्लीन चिट दिल्यामुळे आणि उपमुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा कार्यक्रम रंगणार असल्याने अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचे मानले जात आहे. तरी सोमवारी अजित पवार यांना कोणते पद घोषित होते हे पाहणे औत्स्युक्याचे आहे.
पालकमंत्री कोण होणार ?
मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातील तिघांची संभाव्य यादीत नावे आली आहे. तर आता मंत्रिपदांबरोबरच पुण्याचे पालकमंत्री कोण असणार? याबबत चर्चा रंगली आहे. पालकमंत्रिपदाचा अजित पवार यांना दांडगा अनुभव असून राष्ट्रवादी कॉंग्रेस मेळाव्यात आपणच “पालकमंत्री’ असल्याचे त्यांनी जणू घोषित केले होते. त्यामुळे त्यांच्याशिवाय दुसरे कोणतेही नाव पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे बोलले जात आहे.