सातारा – जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. खरेदी-विक्री संघ मतदारसंघातून आ. मकरंद पाटील, महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातून राजेंद्र राजपुरे व कृषी प्रक्रिया संस्था मतदारसंघातून शिवरूपराजे खर्डेकर यांच्याविरोधात अर्ज दाखल न झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा बाकी आहे.
इतर 18 मतदारसंघांमध्ये मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.
जिल्हा बॅंकेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आज दिवसभर राजकीय घडामोडी सुरू होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष व भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले यांनी शक्तिप्रदर्शन करत सकाळी साडेअकराच्या सुमारास अर्ज भरले.
माढ्याचे खा. रणजीतसिंह निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांनी दुपारी एक वाजता अर्ज भरले. अर्ज भरल्यानंतर त्यांनी निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल करण्याची घोषणा केली. शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनीही बहुतांश जागांवर उमेदवारी अर्ज भरून स्वतंत्र पॅनेल टाकण्याचे सूतोवाच केले. जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादीच्या विरोधात गोरे बंधूंच्या स्वतंत्र पॅनेल्समुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर म्हणजे 10 नोव्हेंबर रोजी अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी खरेदी-विक्री मतदारसंघातून आ. मकरंद पाटील यांच्याविरोधात एकही अर्ज आलेला नाही. या मतदारसंघातून ते बिनविरोध झाले आहेत.
हा मतदारसंघ माजी खासदार, दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांचा असून, त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव मकरंद पाटील यांना या जागेवर संचालक म्हणून घेण्याचे ठरविण्यात आले होते. यावेळी त्यांनी 11 ठराव केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात एकही अर्ज आला नाही.
दिवंगत दादाराजे खर्डेकर यांचे चिरंजीव शिवरूपराजे खर्डेकर यांचा एकमेव अर्ज कृषी प्रक्रिया मतदारसंघातून आल्याने, त्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून राजेंद्र राजपुरे यांच्याविरोधातही अर्ज नसल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पॅनेलचे तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत.