सोलापूर (प्रतिनिधी) – दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. जोराचा पाऊस आल्यामुळे शेतातील एका पत्र्याच्या शेडखाली पाच जण थांबले होते. त्यादरम्यान शेडवर वीज कोसळली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.
मृतांमध्ये पंतूसिंग जीवनसिंग रजपूत, संकेत शिवानंद चोरमोले, पार्वती मलप्पा कोरे यांचा समावेश आहे. रविकांत राजकुमार मुळे आणि धरेप्पा लिंगप्पा म्हेत्रे हे दोघे जण जखमी आहेत. मंद्रुपपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मंद्रुप ते टाकळी रस्त्यालगतच्या दरेप्पा म्हेत्रे याच्या शेतात ही घटना घडली. पावसामुळे झाडाखाली आडोशाला खाली थांबलेले तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.