रायपूर – कॉंग्रेसच्या तीनदिवसीय महाअधिवेशनाचा प्रारंभ उद्यापासून (शुक्रवार) होणार आहे. त्यामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती आणि समविचारी पक्षांशी आघाडी हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी असतील. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष त्या महाअधिवेशनाकडे लागणार आहे.
कॉंग्रेसचे महाअधिवेशन छत्तिसगढच्या रायपूरमध्ये होणार आहे. त्यामध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह सुमारे 15 हजार प्रतिनिधी सहभागी होतील. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने पक्ष संघटनेत चैतन्य निर्माण केले. त्या यात्रेनंतर होणाऱ्या महाअधिवेशनाच्या माध्यमातून कॉंग्रेस आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज होईल.
महाअधिवेशनात कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवडीवर औपचारिक शिक्कामोर्तब केले जाईल. त्याशिवाय, नवीन कार्यकारिणी निश्चित करण्यासाठीचा मार्ग मोकळा केला जाईल. महाअधिवेशनात काय चर्चा होणार, कुठले निर्णय घेतले जाणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. कॉंग्रेसची पुढील वाटचाल कशी असणार याविषयीची बऱ्यापैकी रूपरेषा महाअधिवेशनात ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर पक्षांचे लक्षही कॉंग्रेसच्या महाअधिवेशनाकडे असेल.