नवी दिल्ली – पंजाबमध्येही मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित पुन्हा आमने-सामने आले आहेत. विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यावरून त्यांच्यात लेटर वॉर सुरू झाले आहे. राज्य सरकारने विधानसभेचे अधिवेशन 3 मार्चला बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या पत्रांच्या भाषेवर राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे.
बनवारीलाल पुरोहित म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे पत्र आणि ट्विटची भाषा घटनाबाह्य आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे पत्र केवळ असंवैधानिकच नाही, तर घोर अपमानास्पद आहे. या पत्रात करण्यात आलेला उल्लेख अत्यंत अपमानास्पद असून यावर कायदेशीर निर्णय घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
भगवंत मान यांनी त्यांच्या उत्तरात लिहिले होते की, ते फक्त पंजाबच्या तीन कोटी जनतेला उत्तरदायी आहेत. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या कोणत्याही राज्यपालांना नाहीत. पंजाबच्या जनतेला विचारायचे आहे की, भारतीय राज्यघटनेत कोणतीही विशिष्ट पात्रता नसताना केंद्र सरकार विविध राज्यांमध्ये राज्यपालांची निवड कोणत्या आधारावर करतात?, अशा शब्दांत त्यांनी पत्रात ताशेरे ओढले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री भगवंत मान यांचे 13 फेब्रुवारीचे पत्र हे पुरोहित यांच्या पत्राचे उत्तर होते. ज्यात त्यांनी आम आदमी पक्षाच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच भगवंत मान यांना 14 दिवसांत उत्तर देण्यास सांगितले होते.