सातारा -सातारा आगारात लांब पल्ल्याच्या बहुसंख्य बसेस तांत्रिक असुविधांमुळे प्रवासायोग्य राहिलेल्या नाहीत. त्याकरिता सातारा आगाराकडून राज्य सरकारला ई शिवाई बस मिळाव्यात, यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये राज्यमार्ग परिवहन महामंडळ 150 बस ताब्यात घेणार असून त्यातील किमान तीन बस साताराला मिळतील अशी शक्यता आहे.
पुणे- मुंबई दरम्यान धावणाऱ्या ई शिवाई बससेवेचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दापोडी कार्यशाळेत पहिल्या टप्प्यांतर्गत 150 बस तयार करण्यात येणार आहे. त्यापैकी 100 बस पुण्यातून वेगवेगळ्या मार्गावर धावणार आहेत.
सातारा आगारासाठी यामधील तीन बसची मागणी पहिल्या टप्प्यात पुर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ते म्हणाले मुंबई ते पुणे दरम्यान ई बसची सुरुवात झाली आहे. तसेच पुणे शहरासह मुंबई, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, सातारा, सोलापूर अशा वेगवेगळ्या शहरात ई बस सुरू केल्या जाणार आहेत. ई शिवाई बसची बांधणी व आसन व्यवस्था आरामदायक असून चार्जिंग सस्पेन्शन अत्यंत मजबूत अशा स्वरूपाचे आहे.
सध्या स्वारगेट ते ठाणे दरम्यान 14 बस धावू लागल्या आहेत. राज्य शासनाने तीन टप्प्यांमध्ये या बसच्या विस्तारीकरणाची योजना आखली आहे. सातारा आगाराकडे ही बस आल्यास मुंबई प्रवासासाठी एक आणि पुणे प्रवासासाठी एक अशा मार्गावर ही बस सुरू होण्याची शक्यता आहे. सातारा आगाराचे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी यासंदर्भात दुजोरा दिला नसला तरी प्रस्ताव मात्र पाठवल्याचे सांगितले.
तांत्रिक प्रक्रियेनंतर हस्तांतरण
राज्यातील पहिली ई शिवाई बस पुणे- नगर मार्गावर एक जून 2022 रोजी सुरू झाली होती. त्याच धर्तीवर सातारा आगारातही मजबूत बांधणीच्या ई शिवाई बस तात्काळ दाखल करून घ्याव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे. पुणे विभागात आठ ई शिवाई बस दाखल झाल्या आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाकडे या बसच्या नोंदणीचे काम सुरू आहे. आणखी काही बस येणे बाकी असून, तांत्रिक प्रक्रिया पार पाडल्यानंतर यातील तीन बस सातारा आगाराला दिल्या जातील, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.