तासिका तत्त्वावर “पिळवणूक’ सुरूच : संस्थाचालकांची चलाखी, मात्र कारवाई होईना
पुणे – राज्य शासनाने वरिष्ठ महाविद्यालयांत तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ केली. मात्र, त्यांना वाढीव मानधन दिले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार येत आहे. महाविद्यालयांतील अशा प्राध्यापकांना संस्थेकडून महिन्याला ठराविक रक्कम दिली जात असून, वाढीव मानधनापासून हजारो प्राध्यापक वंचित असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यातील अकृषी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांचे हजारो पदे रिक्त आहेत. त्यातही मंजूर पदाच्या 40 टक्के प्राध्यापकांची पदे भरण्यास परवागनी मिळाली आहे. मात्र ही प्रक्रिया मंदावली आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालयांकडून तासिका तत्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. पूर्णवेळ नियुक्त प्राध्यापकांना मिळणारे वेतन आणि तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मिळणारे मानधन यात कमालीची तफावत असते. त्या पार्श्वभूमीवर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली जात होती. विद्यापीठ अनुदान आयोगानेदेखील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा मानधनाबाबत निर्देश दिलेले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्राध्यापकांना 500 रुपये मानधन देणे आवश्यक आहे. मात्र, अनेक महाविद्यालयांकडून अजूनही तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना एका तासासाठी 250 ते 300 रुपये मानधन दिले जात आहे.
प्राध्यापक भरतीही लटकली
राज्यात निवडणुकांमुळे आचारसंहितेच्या काळात प्राध्यापक भरती होऊ शकली नाही. त्यातच सध्या सरकार स्थापनेबाबत राजकीय पेच निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावी लागेल, अशी परिस्थिती आहे. परिणामी, शासनाकडून पुढील काळात प्राध्यापक भरतीला मंजुरी दिली जाईल किंवा नाही याबाबत सांशकता आहे.
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार महाविद्यालयातील प्राध्यापकांना वाढीव मानधन देणे बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी होत नसेल, त्याचा उच्च शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात येईल.
– डॉ.धनराज माने,संचालक, उच्च शिक्षण ,महाराष्ट्र राज्य