भोर (प्रतिनिधी) -‘माता-पित्याचे छत्र हरपलेल्या तीन भावंडांचा जगण्यासाठी संघर्ष’ या मतळ्याखाली “प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध करताच पिराचा मळा (ता. भोर) येथील तीन भावंडांच्या मदतीला हजारो हात पुढे आले आहेत.
भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील टिटेघर येथील ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांना ही माहिती मिळताच त्यांनी भोरच्या पत्रकारांसमवेत या तीन भावंडांना भेट देऊन त्यांची विचारपूस करुन त्यांना लागलीच 5 हजार रुपयांचा धनादेश दिला. तसेच दरमहा रेशन भरुन देण्याची ग्वाही दिली. तर तहसीलदार अजित पाटील यांनी जीवनावश्यक धान्य व साहित्याचे किट देऊन त्यांच्या भविष्यातील साऱ्या समस्या जसे रेशन, आधार कार्ड, आणि शासकी सुविधा मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
रेश्मा, करण, आणि अर्जून पवार ही तीनही मुले आदिवासी कातकरी समाजातील असून 12 वर्षे वयोगटाखालील आहेत. सहा वर्षां पूर्वीच त्यांच्या माता-पित्याचे निधन झाले असून त्यांना आधार देणारी त्यांची 70 वर्षांच्या आजीचेही मागील वर्षीच निधन झाले. त्यामुळे शेजारची एक मावशी त्यांना जेवण देत असते. मात्र करोनाच्या संकटात गेल्या तीन महिन्यांपासून तीच्याही हाताला कामच नसल्याने तीही हातबल झाली आहे. आज या मुलांना भिमराव शिंदे गुरुजींनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले असले तरी त्यांना शिक्षणासाठी लागणारा खर्च कसा आणि कोण करणार याचे कोडे त्यांना सतावत आहे.
दरम्यान, पत्रकारांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. तर उत्रौली येथील उद्योजक अमित शिवतरे यांनी त्यांच्या झोपडीवर पावासाळ्यात टाकण्यासाठी ताडपत्री, अन्नधान्य आणि रोख रक्कम देणार आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी प्रत्यभेट देवून जिल्हा परिषदेच्या शबरी योजनेतून या मुलांसह इतर आदिवासी कातकरी समाजातील चार कुटुंबाना घरकुल बांधून देण्याचे जाहीर करुन धान्य किट व ताडपत्री देऊन निवाऱ्याची सोय केली आहे. दरम्यान, हे तीन भावंडे सध्या वेनवडी येथील पांडुरंग चव्हाण यांच्या विटभट्टीवर आश्रयाला आहेत.