वाल्हे (वार्ताहर) -लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर आता वाल्हे (ता. पुरंदर) येथील आठवडे बाजार मंगळवार (दि. 9) पासून काही अटी व शर्तीवर सुरू करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. हा बाजार परिसरामधील शेतकरी व स्थानिक व्यापारीवर्गापुरताच सीमित राहाणार आहे.
बाहेरील गावांमधील व्यापाऱ्यांना मनाई करण्यात आली आहेत. हा बाजार महात्मा फुले पुतळयापासून ते गावापर्यंतच्या रस्त्याच्या डाव्या बाजूला भरणार आहे. बाजारामध्ये येताना सर्वांना मास्क किंवा रूमालाचा वापर बंधनकारक करण्यात आले आहे.
बाजाराच्या ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. बाजारातील सर्व दुकाने व ग्राहक यांच्यामध्ये सहा फुटाचे सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.