लखनौ – उत्तर प्रदेशचे माजी मुुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav ) बुधवारी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रिवा येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीवर (BJP) जोरदार प्रहार केला. मध्य प्रदेशात भाजपचे इतके वर्षे सरकार होते. मात्र येथील बेरोजगारी कमी करण्याकरता या पक्षाने काहीच केले नाही अशी टीका त्यांनी केली. ( Madhya Pradesh Legislative Assembly election 2023)
ते पुढे म्हणाले की, जर सरकारी शाळा बंद करण्यात आल्या तर गरिबांची मुले काय करतील? ते कुठे शिकतील; खासगी शाळांमध्ये ते शिकू शकतील का आणि त्यांचे भविष्य काय असेल. त्यामुळे ज्यांनी सरकारी शाळा बंद केल्या आहेत त्यांना लोकांनीच आता सत्तेवरून दूर करावे. दरम्यान, इंडिया ही विरोधी पक्षांची आघाडी आहे.
या आघाडीत आपल्या समाजवादी पक्षाचाही समावेश आहे. मात्र आमची एक स्वतंत्र लढाईसुध्दा आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीला देशाची निवडणूक समजावी असे आवाहन करतानाच या निवडणुकीतूनच देशासाठी एक संदेश जाणार आहे. अगोदर दिल्लीत निवडणूक घ्यायची की मध्य प्रदेशात याबाबत त्यांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीने बराच विचार केला आणि शेवटी अगोदर मध्य प्रदेशात निवडणुका घेण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचा दावा अखिलेश यांनी केला.
अखिलेश पुढे म्हणाले की, तुम्हीही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत सहभागी व्हा असे लोक आम्हाला सांगतात. मात्र ज्याला पंतप्रधान व्हायचे आहे त्यांनी उत्तर प्रदेशात यावे एवढेच आम्हला ठाऊक आहे. गुजरातमधूनच पंतप्रधान होता आले असते तर मोदी उत्तर प्रदेशातून निवडणुकीत उतरले नसते.
मध्य प्रदेशातील सहकाऱ्यांना मी एवढेच सांगू इच्छीतो की भाजप बेइमान आहे. ते जी आश्वासने देतात ती पूर्ण करत नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शब्द त्यांनी दिला होता. मात्र महागाई दुप्पट केली. शेतकऱ्यांना कोणत्या पिकासाठी दुप्पट मोबदला मिळाला असा सवालच त्यांनी केला.
यावेळी त्यांनी आपले पिता मुलायम सिंह यादव यांचेही स्मरण केले. जेंव्हा फुलन देवी यांना समाजवादी पक्षाने लोकसभेसाठी उमेदवारी दिली होती त्यावेळी आम्हाला खूप विरोध झाला होता. मात्र नेताजींनी हा विरोध डावलून फुलन देवी यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता अशी आठवण अखिलेश यांनी सांगितली.