कराड – यंदा करोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक सणोत्सव रद्द करावे लागले आहेत. येत्या काही महिन्यांवर सर्व अबालवृद्धांचे दैवत असणाऱ्या गणरायाचे आगमन होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक व घरगुती गणेश मुर्तींची उंची ही तीन फुटापर्यंतची असावी असा एकमुखी निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीसाठी तहसीलदार अमरदीप वाकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेवक विजय वाटेगावकर, हणमंत पवार, सौरभ पाटील, गजेंद्र कांबळे, बाळासाहेब यादव, फारूक पटवेकर, स्मिता हुलवान, शारदा जाधव, अंजली कुंभार, कुंभार समाजातील मुर्तिकार, गणेश मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे म्हणाले, करोना महामारीमुळे शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद, महाराष्ट्रातील सर्व वारकरी सांप्रदायाची आषाढी वारी रद्द करावी लागली आहे. पावसाळ्यात या करोना महामारीचे प्रमाण आणखी वाढू शकते. याचकाळात गणेशोत्सवही येत आहे. याकाळात मुर्तिकारांचे नुकसान होऊ नये याचा विचार करून या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.
गतवर्षी महापुरामुळे कुंभार समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षीही नुकसान होऊ नये यासाठी फक्त तीन फुटाच्या गणेशमुर्ती बनवाव्यात. या उंचीच्या मुर्तीचा घरीही उपयोग होऊ शकतो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील म्हणाले, ज्या मुर्तिकारांच्या पाच फुटापर्यंतच्या मुर्ती तयार आहेत. त्यांनी त्यांचे रंगकाम अथवा उरलेले काम करू नये. त्यामुळे त्यांचा वाढीव खर्च होणार नाही. याच काळात कुंभार समाजाचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी त्यांनी बनवलेल्या पाच फुटाच्या गणेश मुर्तीचा विचार केला जाणार नाही.
कुंभार समाजातील मुर्तिकारांनी प्रशासनाच्या सूचनास सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच काही मागण्या उपस्थित केल्या. गतवर्षी महापूरामुळे अनेक मुर्तिकारांचे नुकसान झाले आहे. यावर्षी महापुराची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुर्तिकारांसाठी कायमस्वरूपी 90 वर्षाच्या करारावर जागा देण्यात यावी. कुंभार समाजाच्या टेंभू येथील जागेबाबत विचार करावा. जागेचे भाडे माफ करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी उत्सव काळात अनेक बाहेरील विक्रेते गणेशमुर्ती विक्रीसाठी येतात. त्यांच्यावर प्रशासनाने बंदी आणावी. शाडूच्या मुर्ती तयार केल्या जाव्यात, विसर्जन काळात नदी पात्रातील पाणीपातळी काही दिवस एकच असावी, गणेश मंडळांनी कायमस्वरूपी एकच मुर्ती तयार करावी अशा सूचना काही नगरसेवकांनी केल्या.