संत तुकाराम महाराज पालखी सोहळा : मंदिर परिसरात राज्य राखीव पोलीस दल तैनात
श्री क्षेत्र देहूगाव – करोनाच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी म्हणजे बुधवारपासून (दि. 10) देहूतील मुख्य मंदिराला राज्य राखीव पोलीस दलाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तर पालखी प्रस्थान धार्मिक कार्यक्रमाला असणाऱ्या उपस्थितांच्या संख्येबाबत अद्याप निर्णय झाला नाही. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती देहू संस्थांनाकडून देण्यात आली आहे.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी 335 वा पालखी सोहळा प्रस्थान तीर्थक्षेत्र देहूच्या मुख्य मंदिरात शुक्रवारी (दि. 12) दुपारी दोनच्या सुमारास ठेवणार आहे. या पालखी प्रस्थानच्या धार्मिक कार्यक्रमास पालखी सोहळा प्रमुख, संस्थानचे आजी, माजी अध्यक्ष, विश्वस्त, वंशज, विणेकरी, भाविक, वारकरी, शासकीय पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी भजनी मंडपात उपस्थित राहतात.
जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा या उपस्थितांच्या मोठ्या संख्येला आळा बसणार आहे. या उपस्थितांच्या संख्येचा वरिष्ठ पातळीवर अद्याप अनिर्णयीत आहे. शासनाला सहकार्य करीत संस्थानने सोहळा प्रमुख, विश्वस्त, विणेकरी, पालखीचे खांदेकरी, विविध माध्यमांचे प्रतिनिधी आदी 50 जणांच्या उपस्थितांचे मागणीचा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांशी झालेल्या बैठकीत मांडला होता. मात्र मर्यादित उपस्थितांच्या संख्येमुळे आयुक्तांनी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविल्याने अद्याप अनिर्णीत असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांनी दिली.
मुख्य मंदिर 30 जूनपर्यंत भाविकांसाठी बंद
देहूतील मुख्य मंदिर 30 जूनअखेरपर्यंत भाविकांना दर्शनार्थ बंद आहे. पालखी सोहळा प्रस्थान, तीर्थक्षेत्र देहूहून तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे पादुका मार्गस्थ, पुनरागमन आणि पालखी सोहळ्याची 16 जुलैला होणाऱ्या सांगतापर्यंत मुख्य मंदिराला राज्य राखीव पोलिसांच्या दोन तुकड्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. हा बंदोबस्त पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी म्हणजेच बुधवारपासून (दि. 10) असणार असल्याची माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याण यांनी दिली.