प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 -विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देणारी आविष्कार स्पर्धा यंदाच्या वर्षी दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा घेण्यात येणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे.
यदांच्या वर्षीची आविष्कार ही स्पर्धा 15 सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये तसेच 25 ते 30 वर्ष जुन्या महाविद्यालयांमध्ये राबविण्यात यावी, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केले आहे. याबाबत ही स्पर्धा सुरुवातीला महाविद्यालय स्तरावर, त्यानंतर विभागीय स्तरावर, मग जिल्हा आणि त्यानंतर विद्यापीठ स्तरावर होते. या विद्यापीठ स्तरावरून मग राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत पदवी अभ्यासक्रम शिकणारे, पदव्युत्तर, संशोधनाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक देखील सहभागी होऊ शकतात. यातील विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकासोबतच शिष्यवृत्ती देखील देण्यात येते. या वर्षाअखेर यंदाच्या या अंतिम स्पर्धा होणे अपेक्षित आहे.
महाविद्यालयातून साधारण अकराशे विद्यार्थी तसेच प्राध्यापक या स्पर्धेत सहभागी होत असतात. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांनी केलेली अनेक चांगली व समाजोपयोगी संशोधने समोर आली आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या डॉ. सुप्रिया पाटील यांनी दिली. आयोजनाचा विद्यापीठाला मान मिळाल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात यात सहभागी व्हावे, असे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे सांगितले.