नवी दिल्ली- देशभरात आज राष्ट्रीय किसान दिवस साजरा होत आहे. अशातच केंद्र सरकारच्या कृषी धोरणाला विरोध करण्याकरिता गेल्या तीन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. यावरून देशातील सामान्यांपासून ते सिनेकलाकार, राजकीय नेते अनेकांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
यातच आता मुकेश खन्ना यांनी सोशल माध्यमातून शेतकरी आंदोलनाच्याबाबत त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे की, ‘देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत आणि त्या आजतागायत बदललेल्या नाहीत. शेतकऱ्यांची परिस्थिती अनेक वर्षांपासून अतिशय वाईट आहे आणि त्यासाठी आपल्या देशाचे धारण कारणीभूत आहे.
ते पुढे म्हणाले, ‘देश स्वतंत्र झाल्यानंतर जवाहरलाल नेहरुंनी शहरीकरणाला प्राधान्य दिले. त्यांनी शहरीकरणाऐवजी खेड्यांच्या प्रगतीकडे लक्ष दिले असते तर आज ही परिस्थिती निर्माणच झाली नसती. आपल्या देशात शहरांपेक्षा गावाचे प्रमाण अधिक आहे. खेड्यांची प्रगती झाली तर विकास होईल असे मला वाटते. माझे हे मत ऐकल्यावर मी भाजपाला पाठिंबा देतोय असे तुम्हाला वाटेल. पण असे काहीही नाही , मी नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे.’
दरम्यान, पंजाबी कलाकार असो वा बॉलिवूड कलाकार सर्वच जण शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री सोनम कपूर, दिग्दर्शक हंसला मेहता, दिलजीत दोसांज, सनी देओल, प्रियांका चोप्रा, प्रति झिंटा, या सर्वांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत आंदोलनावर भाष्य केलं आहे.