टेकवडीवर समतल चर तसेच वृक्षारोपणामुळे परिस्थिती आटोक्यात
– अभिराज भडकवाड
औंध – बाणेर परिसरामध्ये 120 मिलिमीटर पाऊस झाला आहे. मुसळधार पाऊस होऊनही ओढ्यानाल्यांना पूर आला नाही. वसुंधरा अभियान व बाणेरमधील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी डोंगरावर तयार केलेल्या सलग समतल पातळी चरांमुळे पूरस्थिती काही प्रमाणात आटोक्यात येण्यास मदत झाली आहे.
बाणेर परिसरामध्ये काही वर्षांपूर्वी पुरामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर येथील टेकडीवर सुमारे चार किलोमीटर परिसरात वसुंधरा अभियानच्या कार्यकर्त्यांनी वृक्षसंवर्धनाची मोहीम राबविली. यातून परिसरामध्ये टेकड्यांवर हजारो समतल चर खोदण्यात आले आहेत. येथे वृक्षारोपणही करण्यात आले. याचा परिणाम या पावसाळ्यात दिसून आला.
मुसळधार पाऊस असतानाही टेकवडीवरील चरांमध्ये पाणी थांबून राहिले. बाणेर परिसरातही ओढ्यांचे पात्र अरुंद झाली आहेत. त्यातच कॉंक्रीटच्या रस्त्यांमुळे ओढ्याच्या पात्रांमध्ये पाणी येण्याचा वेगही वाढला आहे. यातून येथील सोसायटी तसेच रस्त्यावर पाणी शिरते; परंतु यावर्षी डोंगरावरील सलग समतल पातळी चरांमुळे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडून देखील या भागात पूरस्थिती निर्माण झाली नाही.
बाणेर टेकडी झाली हरित…
परिसरातील नागरिकांनी सुरू केलेल्या वसुंधरा अभियान, वसुंधरा स्वच्छता अभियानच्या माध्यमातून मागील 14 वर्षे सातत्याने वृक्षारोपण व चर खोदण्याचे काम सुरू ठेवले आहे. यामुळे टेकडी हिरवीगार झाली असून जैवविविधतेत देखील मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत आहे. या टेकडीवर खोदण्यात आलेले चर यामुळे लाखो लिटर पाणी जमिनीमध्ये मुरण्यास मदत होत आहे.