नवी दिल्ली : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे नेते राहुल गांधीही प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. पंतप्रधानांनी महाआघाडीवर टीकास्त्र डागल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रचाराच्या मैदानातून मोदींना सडेतोड उत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी चीन सीमावाद व रोजगाराच्या मुद्यावरून मोदींना सवाल करत बिहारच्या जनतेला सत्तांतराचे आवाहन केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिथे जातात तिथे खोटं बोलतात असे म्हणत मोदींवर टीका केली आहे.
राहुल गांधी व तेजस्वी यादव यांची संयुक्त बदलाव संकल्प रॅली नवादा जिल्ह्यातील हिसुआमध्ये झाली. या रॅलीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर खोटं बोलत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी म्हणाले,”बिहारमधील जे सैनिक शहीद झाले, त्यांच्यासमोर पंतप्रधान नतमस्तक होत आहेत. संपूर्ण देश शहिदांसमोर नतमस्तक होतोय. प्रश्न नतमस्तक होण्याचा नाही. जेव्हा बिहारमधील जवान शहीद झाले, त्या दिवशी पंतप्रधान काय म्हणाले, हा प्रश्न आहे. लडाखमध्ये देशाची सीमा आहे. त्या सीमेवर बिहार, उत्तर प्रदेश व इतर राज्यातील तरुण देशाचं संरक्षण करतात. उपाशी राहतात, पण परत येत नाहीत,” असं राहुल गांधी म्हणाले.
Don't lie to Biharis, Modi Ji. Did you give jobs to Biharis? Last elections, PM promised 2 crores jobs, no one got them. In public,he says I bow my head to Army, farmers, labourers & traders. But once he reaches home, he only works for Ambani & Adani: Congress Leader Rahul Gandhi https://t.co/X01SdXA1Pg pic.twitter.com/6QBE8U4L7q
— ANI (@ANI) October 23, 2020
“प्रश्न हा आहे की, चीनच्या जवानांनी आपल्याला जवानांना शहीद करून १२०० किमी जमीन चीनने घेतली. चिनी सैन्य भारतात आहे. चीन भारतीय हद्दीत घुसले होते, तेव्हा मोदी असं का म्हणाले होते की, भारतात कुणीही घुसखोरी केली नाही. आज म्हणतात नतमस्तक होतो. पण, खोटं बोलून त्यांनी शहिदांचा अपमान केला. आता प्रश्न आहे की, चीनला परत कधी हद्दपार करणार. आणि येथे येऊन काहीही खोटं बोलू नका. बिहारींना खोटं बोलू नका. तुम्ही सांगा किती बिहारींना रोजगार दिली.
मागील निवडणुकीत म्हणाले होते २ कोटी तरुणांना रोजगार देणार. कुणाला मिळाला का? येतात आणि म्हणतात, शेतकरी, जवान आणि मजुरांच्या समोर मी नतमस्तक होतो. घरी गेल्यावर अंबानी व अदानीचं काम करतात. तुमच्यासमोर डोकं ठेवणार आणि काम दुसऱ्याचं करतात. भाषण तुम्हाला देणार, पण काम करायची वेळ आली की, दुसऱ्याचं करणार. नोटबंदी केली. आपल्याला फायदा झाला का? तुमचा पैसा घेतला आणि भांडवलदारांचं कर्ज माफ केलं. आता तीन कृषी कायदे केले आहेत. संपूर्ण देशात बाजार समिती व्यवस्था संपवणार आहेत. लाखो लोकांना बेरोजगार करणार आहेत आणि जिथेही जातात, तिथे खोटं बोलतात. भारताची जमीन कुणीही घेतली नाही. लाखो लोकांना रोजगार दिला. शेतकऱ्यांसोबत उभा आहे. पण, काम फक्त दोन लोकांचं करतात,” अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली.