मुंबईच्या आरे कॉलनीतील वृक्षतोड : पुणेकरांचा संताप
पुणे – मुंबईतील आरे कॉलनीतील वृक्षतोडीबाबत पुण्यातील वृक्षप्रेमी नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियाद्वारे लोकांनी या वृक्षतोडीचा निषेध नोंदविला आहे. इतकेच नव्हे, तर काही जणांकडून हा वृक्षांवरील “सर्जिकल स्टाइक’ असल्याची भावनादेखील व्यक्त केली जात आहे.
मुंबईत मेट्रो कारशेडच्या उभारणीसाठी आरे कॉलनी परिसरातील तब्बल 1,800 झाडे कापण्यात आली. शुक्रवारी रात्री घाईघाईने मोठी यंत्रणा लावून वृक्षतोड करण्यात आली. या घटनेबाबत पर्यावरण क्षेत्रातून तीव्र पडसाद उमटले असून देशभरातून पर्यावरणप्रेमींना या वृक्षतोडीबाबत नाराजी व्यक्त करत ही पर्यावरणाची हार असल्याची खंत व्यक्त केली. पुण्यातील वृक्षप्रेमींकडूनही या प्रकरणाबाबत संताप व्यक्त करत प्रशासनाची मनमानी पर्यावरणाच्या मूळावर उठल्याची भावना व्यक्त केली आहे. याबाबत वृक्षप्रेमींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “आरेतील वृक्षतोड ही नियमबाह्य असून, यामुळे पर्यावरणाची मोठे हानी होणार आहे. त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील.’
“वृक्षतोडीपूर्वी पर्यावरण परिणामांचा अभ्यास केला जाणे आवश्यक आहे, मुंबई महापालिकेने असा कोणता अभ्यास केला होता का?’, “शासनाने पुनर्रोपण केलेल्या वृक्षाच्या जगण्याचे प्रमाण नगण्य आहे, अशावेळी आरेतील वृक्षतोड केलेल्या वृक्षांबाबत हीच स्थिती होणार नाही, याची शाश्वती कोण देणार?’ “भारत सरकारने पाकिस्तानवर मध्यरात्री सर्जिकल स्ट्राइक केला, तर महाराष्ट्र सरकारने आरेतील झाडांवर सर्जिकल स्ट्राइक केला.’ असे अनेक प्रश्न, प्रतिक्रिया व्यक्त करत पर्यावरणप्रेमींनी या घटनेबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.