आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केल्यानंतर आशिष शेलारांची टीका
मुंबई : राज्यातील सत्तापेचाचा निर्णय आणखी तसाच कायम आहे. तर देवेंद्र फडणवीस सरकारला आपली बाजू न्यायालयात मांडण्यासाठी आणखी 24 तासांचा अवधी मिळाला आहे. कारण या प्रकरणाची सुनावणी आता उद्या सकाळी होणार आहे. एकीकडे न्यायालयात सुनावणी सुरू असताना दुसरीकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राजभवनात सत्तास्थापनेविषयी राज्यपालांना पत्र दिले आहे. याच पत्रावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपालांना महाविकास आघाडीने दिलेले पत्र म्हणजे तीन पक्षांची पागलपंती आहे असा टोमणा भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे. आज महाविकास आघाडीने राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचं पत्र दिलं. मात्र यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट केलेलं नाही. विधीमंडळाचे नेते म्हणून जयंत पाटील यांनी सही केली आहे. मात्र त्यांना सही करण्याचा अधिकार नाही. कारण अजित पवार हेच विधीमंडळ नेते आहेत. कॉंग्रेसने अद्याप त्यांचा नेताच निवडलेला नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर ही महाविकास आघाडीची पागलपंती आहे यात शंकाच नाही असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं.
आज राज्यपालांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेटून 163 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं. तसेच आम्हाला सत्तास्थापनेची संधी द्या अशीही विनंती करण्यात आली. मात्र या सगळ्यावर भाजपाने टीका केली आहे. हा सगळा प्रकार निव्वळ अस्वस्थ आमदारांना दिलासा देण्यासाठी तीन पक्ष करत आहेत असाही टोला आशिष शेलार यांनी लगावला.