थंडीची चाहूल लागताच मागणी वाढली; दोनशे टक्के आयातशुल्काचा परिणाम
पिंपरी – केरळ, गोवा, काश्मिर व पाकिस्तान येथून शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुका मेवा बाजारात दाखल होतो. या सुक्यामेवाला सध्या शहरवासियांकडून चांगली पसंती मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानातून येणाऱ्या सुक्यामेव्यावर तब्बल 200 टक्के आयात शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे यंदा सुका मेव्याच्या भावात चांगलीच दरवाढ झाली आहे.
गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने पिंपरी-चिंचवडकरांनी पौष्टिक पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या बदाम, काजू, खारीक, खोबरे, आक्रोड यासारख्या सुक्या मेव्याच्या खरेदीसाठी गर्दी केली आहे. यंदा देशांतर्गत खोबरे व जर्दाळुचे उत्पादन चांगले झाल्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा दर कमी झाले आहेत.
हिवाळ्यात शरीराचे तापमान योग्य राखले जावे यासाठी पौष्टिक डिंकाचे लाडूसारखे विविध पदार्थ व सुकामेवा खाण्यास पंसती दिली जाते. शहरामध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने सुकामेवा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पाऊले बाजारपेठेकडे वळू लागली आहेत. मात्र पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंवर भारत सरकारने 200 टक्के आयात शुल्क आकारल्याने सुक्या मेव्याचे भाव वाढले आहेत. पाकिस्तानमधून खारीकची मोठ्या प्रमाणावर आवक राज्यामध्ये होते. राज्याच्या मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या बाजारपेठेतून इतर ठिकाणी खारीक पोहचवली जाते. मात्र यंदा पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या खारीकवर जादा आयातशुल्क आकारल्याने गतवर्षी 100 ते 150 रुपये किलोने मिळणारी खारीक 300 ते 350 रुपयांवर पोहचली आहे.
गेल्या वर्षी याच थंडीच्या हंगामात खारीकचे भाव 150 रुपये प्रती किलो होते. मात्र पुलवामा घटनेनंतर भारत पाक व्यापारी संबंध काही प्रमाणात थांबले. तसेच थोड्याप्रमाणात सुरू असलेल्या आयातीवर जादा आयातशुल्क लावण्यात आले. त्यामुळे खारीकचे भाव थेट 350 रुपयांवर पोहचले. यात दर्जानुसार 280 रुपयांपासूनही खारीक उपलब्ध आहे. मात्र चांगल्या दर्जाच्या खारीकचे भाव 350 रुपयांवर आहेत.
हिवाळ्यामध्ये खारीकचे भाव दुपटीवर पोहचतात. या दिवसांमध्ये मागणी वाढल्याचाही परिणाम होतो. मात्र यंदा जास्त भाव वाढले आहेत. त्यामुळे मागणीला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच यंदा थंडीही उशीरा सुरू झाल्याने अद्याप ग्राहकांकडून जास्त मागणी केली जात नव्हती.
– रुपेश भळगट,विक्रेते