नवी दिल्ली: ही कुठलीही राजकीय भेट नाही, आम्हाला सरकार पाडणे वगैरेमध्ये रस नाही, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, यासाठी ही भेट झाली. अंतर्विरोधाचं हे सरकार चालेल तोपर्यंत चालेल, पडेल तेव्हा बघू काय करायचे, असे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सांगितले. अमित शहा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच जाहिरातींवर कुणाचेही फोटो छापा, मारामाऱ्या करा, पण लोकांना फायदा झाला पाहिजे असे निर्णय घ्या, असा टोला “महाजॉब्स’ पोर्टलवरुन शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये उडालेल्या खटक्यांवरुन फडणवीसांनी लगावला.
अमित शहा यांच्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले, यंदा महाराष्ट्रात ऊसाचं पीक वाढले, शेतकऱ्यांना एफआरपी आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी. राज्यातील कर्जाचं पुनर्गठण, साखर कारखान्यांना मदत, सॉफ्ट लोन, साखर भाव पडणार नाही यासाठी सकारात्मक चर्चा झाली. किमान विक्री दर वाढवण्याची मागणी केली. तसेच कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहोत, केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी योग्य मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शरद पवार काय करत आहेत, म्हणून आम्ही करायचं वगैरे अशी स्पर्धा नाही. केंद्रात आमचं सरकार आहे, त्यामुळे ज्या आवश्यक मागण्या आहेत त्या घेऊन आलो आहोत. अमित शहा देशाचे गृहमंत्री असल्याने त्यांचे महाराष्ट्रातील करोनास्थितीवर लक्ष आहे. पंतप्रधान मोदींची वेळ मिळाली तर त्यांची भेट घेऊन राज्यातील करोना स्थितीची माहिती देईन, असेही त्यांनी सांगितले.