मुंबई – अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजप आणि शिंदे सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तसेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्य या निर्णयानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यावर अजित पवार यांनी राज्याच्या विकासासाठी आपण युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यांचं अजित पवार यांनी सांगितले. त्यांच्या याच मुद्द्यावररुन अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. अजितदादांचा हा विकास म्हणजे शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा घोर अपमान असल्याचे आजच्या ‘सामना’ अग्रलेखातून म्हंटले आहे.
काय लिहिले सामना अग्रलेखात?
जे आमदार आपल्या गटात नाहीत त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी एक फुटकी कवडी द्यायची नाही अशी बनवाबनवी राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री करीत आहेत. आता हा विकास आहे असे जर अजित पवारांना वाटत असेल तर ते शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा घोर अपमान करीत आहेत. सत्तेच्या मस्तवालपणातून जमा केलेल्या गडगंज इस्टेटीवर ईडी, इन्कम टॅक्सचे मुंगळे चढले. ते मुंगळे डसू लागल्यावर भाजपच्या गोठयात शिरणाऱ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, 2024 मध्ये नक्कीच सत्ताबदल होत आहे व शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे ‘‘आज कपाटात गेलेल्या फाइली पुन्हा टेबलावर येतील.’’
विकासासाठी आपण शिंदे-फडणवीस यांच्याबरोबर गेल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. हा दावा पोकळ आणि बिनबुडाचा आहे. अजित पवार यांना विकासाची हौस आहे हे मान्य, पण गेली अनेक वर्षे सत्तेत असताना त्यांनी विकासाचे असे कोणते इमले रचले? बारामतीत जाऊन अजितदादा असेही म्हणाले की, ‘‘मला सत्तेची हाव नाही. मी सत्तेसाठी हपापलेला कार्यकर्ता नाही. शाहू, फुले, आंबेडकर अशा महान विभूतींचे विचार आपण पुढे नेणार आहोत’’. मुळात महाराष्ट्रासह देशात धार्मिक तणाव निर्माण करून दंगली घडविणे हा भाजपचा एककलमी कार्यक्रम आहे. लोकांना धर्माच्या, जातीच्या नावावर झुंजवायचे हा काही शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार नव्हता, असे सामना अग्रलेखात म्हंटले आहे.
काकांच्या मेहनतीवर ‘डल्ला’ मारण्याऐवजी…
अजित पवार यांचे जे सांगणे आहे की, मला सत्तेची हाव नाही. ते खरे असेल तर त्यांनी आमदारांना गोळा करून आपल्या काकांचा पक्ष का फोडला? जो पक्ष काकांनी स्थापन केला त्याच काकांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून का हाकलले? आता सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे की, ‘‘अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत,’’ सत्तेची हाव नसल्याचे हे लक्षण अजिबात नाही. अजित पवार यांना ‘हाव’, ‘भूक’ नसती तर त्यांनी सरळ राजकारण संन्यास घेऊन कृषी, सामाजिक कार्यात झोकून दिले असते व ते जर प्रामाणिक, स्वाभिमानी राजकारणी असते तर काकांच्या मेहनतीवर ‘डल्ला’ मारण्याऐवजी स्वतःचा नवीन जागतिक पक्ष स्थापन करून वेगळे राजकारण केले असते, पण अजित पवारांना सर्वच आयते मिळाले.
एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपने जे अचाट, पण बुळेगिरीचे काम करून घेतले तेच काम अजित पवारांकडून करून घेतले. मुळात शिवसेना ही जशी मिंधे गटाची नाही तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही अजित पवार गटाचा नाही.आपल्याला सत्तेची हाव नाही वगैरे अजित पवारांचे बोलणे झूठ आहे. शिंदे व अजित पवार हे कोणत्याही उदात्त विचाराने पक्षाबाहेर पडलेले नाहीत तर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वगैरेंच्या चौकश्या नकोत या भयाने त्यांनी गुडघे टेकले हे बारामतीत त्यांच्यावर फुले उधळणारी जनताही जाणते. प्रश्न राहिला विकासाचा वगैरे. शिंदे-अजित पवारांच्या विकासाच्या व्याख्या म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीची फसवणूक आणि लूट आहे, अशी टीका सामनातून अजित पवार यांच्यावर करण्यात आली आहे.