मुंबई – नुकत्याच पार पडलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या संपूर्ण राज्यात चर्चा आहे. खासकरून कसबा मतदार संघात पुणेकरांनी काँग्रेसला दिलेल्या साथीमुळे या पोटनिवडणुका आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर देखील प्रभाव पाडणार असल्याचे बोलले जात आहे. यावरूनच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सूचक विधान केलं आहे. देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होत असं स्पष्ट पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
पंजाब, केरळ,दिल्ली, प. बंगाल, तामिळनाडू हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा सत्तेत नाही. कर्नाटकात आमदार फोडून त्यांनी सत्ता मिळवली. आगामी काळात मतदान करताना लोक याचा नक्कीच विचार करतील असं शरद पवार यावेळी म्हणाले. तसेच यावेळी बोलताना पवार यांनी पार पडलेल्या तीन राज्यातील निवडणुकांसह,पोट निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार पडलेल्या काही निवडणुकांचे दाखले देखील दिले.
कसब्याबाबत बोलताना पवार म्हणाले,”आम्ही जी मतांची माहिती घेतली त्यावरून केवळ दोन ठिकाणी भाजपला जास्त मत मिळाली नाहीतर सगळीकडे भाजपा मागे होता. सदाशिव पेठ,नारायण पेठ आणि शनिवार पेठ या भागातून देखील धंगेकरांना आघाडी मिळाली. हा बदल आहे आणि हा बदल पुण्यात होतोय याचा अर्थ लोक वेगळ्या विचारात आहेत हे स्पष्ट होतंय” असं पवार म्हणाले.
भाजपचा गड ढासळला
कसबा निवडणुकीत भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. रवींद्र धंगेकर याच्या विरोधात हेमंत रासने अशी अटीतटीची लढाई होईल असं वाटत होत. मात्र प्रत्येक फेरीमध्ये धंगेकर यांना पुणेकरांनी पसंती देत निवडून दिल. धंगेकर यांच्या विजयामुळॆ भाजपचा गड मानला जाणारा कसबा मतदारसंघ काँग्रेसच्या हातात गेला. आता आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांवर याचा कितपत परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.