नगर – राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कार्यरत सचिव ते शिपाई या सर्व कायम सेवेतील व हंगामी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ठ करुन घ्यावे या मागणीसाठी सुरु केलेल्या आंदोलनाची शासनाने अद्याप दखल न घेतल्याने नगरमधील बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या कार्यालयात जावून निवेदन दिले.
बाजार समितीचे संदीप पवार, निरीक्षक संजय नन्नवरे, सचिन सातपुते, जयसिंग भोर, सुधीर कोतकर, विशाल साळवे, संतोष बेरड, किशोर वाटाडे, वैभव राहिंज, चंद्रकांत सांगळे यांच्यासह शिष्टमंडळाने पालकमंत्री प्रा.शिंदे यांची भेट घेवून निवेदन दिले. निवेदनात , महाराष्ट्र राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव ते शिपाई पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ठ करणेसाठी महाराष्ट्र राज्य कृषि उत्पन्न बाजार कृती समितीने दि. 27 जुलै पासून आझाद मैदान मुंबई येथे आबासाहेब पाटील यांचे अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन सुरु केले आहे.
धरणे आंदोलनास महाराष्ट्रातील तसेच नगर जिल्हयातील सर्व बाजार समित्यानी जाहिर पांठिबा दिला असून बाजार समितीचे सर्व कर्मचारी सामुहिक रजेवर आहेत. तसेच राज्यातील बहुतांशी बाजार समितीचे कर्मचाऱ्यांनी सोमवार (दि.5) पासून कार्यालयातील कामकाज पुर्णपणे बंद केलेले आहे. आंदोलन सुरु होऊन आज 10 दिवस झालेले असून याबाबत शासनाने अद्यापर्यंत कर्मचारी आंदोलनाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. तरी शासनाने याबाबत लवकरात लवकर लक्ष घालून राज्यातील बाजार समितीचे कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली.