पुणे – भारत संचार निगममधील (बीएसएनएल) कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार अखेर 5 ऑगस्ट रोजी मिळाला. याबद्दल कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी असा प्रकार दुसऱ्या वेळी घडला आहे. त्याचबरोबर कंपनीवरील कर्ज आणि एकूण उलाढाल पाहता आगामी काळातही असे प्रश्न निर्माण होऊ शकतात, अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पगार 5 ऑगस्ट रोजी झाल्याच्या वृत्ताला बीएसएनएल मुख्यालयानेही दुजोरा दिला आहे. या अगोदर फेब्रुवारीमधील पगाराला असाच उशीर झाला होता. कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे, केंद्र सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे कंपन्यांची परिस्थिती खराब झाली आहे. आता या कंपन्यांचे विलिनीकरण करून किंवा इतर मार्गाने कंपन्यांचे पुनरुज्जीवन करणार असल्याचे संकेत सरकारने दिले आहेत. असे असले तरी याबाबी नेमक्या कशा पद्धतीने आणि कधी होणार याबाबत कर्मचाऱ्यांना शंका आहे. आपली ही परिस्थिती एअर इंडियाप्रमाणे होते की काय अशी भीती त्यांनी व्यक्त केली.