जयपूर – राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रे’ दरम्यान देण्यात आलेल्या ‘जय सियाराम’ घोषणेवरून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज पुन्हा एकदा भाजप आणि संघावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे ते फक्त जय श्रीरामची घोषणा देतात.
त्यांनी सीतेला रामापासून वेगळे केले आहे. आम्ही मात्र जय सीयाराम अशी घोषणा देतो, त्याचा त्यांना राग येतो असे गहलोत म्हणाले. आमच्या या घोषणेला जनतेकडून मोठाच प्रतिसाद मिळत असतो असेही त्यांनी नमूद केले. भाजप ‘जय श्री राम’ म्हणत समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही त्यांनी केला. जयपुर मध्ये रूग्णवाहिका सेवेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
गेहलोत यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा उल्लेख करून सांगितले की, या यात्रेच्या माध्यमातून ते प्रेम, सद्भाव आणि बंधुतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप जाती, पंथ आणि धर्माच्या नावावर निवडणुका कशा जिंकतो, हे लोकांना एव्हाना लक्षात आले आहे.