ठाकरे मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारामध्ये मित्रपक्ष असलेल्या शेकाप आणि समाजवादी पक्षाला स्थान नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर फडणवीस सरकारमधील शिवसेनेचे दिग्गज नेतेही गायब आहेत.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, शेकापचे विधानपरिषदेवरील आमदार जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. शिवसेनेकडून पाठिंबा देणाऱ्या तिघा आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. परंतु कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून मित्रपक्षांची नावे पुढे करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे शेकाप आमदार जयंत पाटील यांनी तर आपल्याला शपथविधीचे आमंत्रणही नसल्याचे सांगितले.
दुसरीकडे, कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. राष्ट्रवादीकडून रोहित पवार यांचेही नाव नसल्याने भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेनेने मुंबई, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच विभागांची सांगड घालत मंत्र्यांची यादी तयार केल्याचे दिसते. मात्र रवींद्र वायकर, दीपक केसरकर, दिवाकर रावते, रामदास कदम, दीपक सावंत, तानाजी सावंत या फडणवीस सरकारमधील मंत्र्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे पाहायला मिळते.
दरम्यान, संजय राऊत यांचे बंधू आणि विक्रोळीचे आमदार सुनिल राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे राऊतही नाराज असल्याचे बोलले जात आहे.