माधव विद्वांस
स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, संपादक, राम मनोहर लोहिया यांचे अनुयायी राजनारायण यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 15 मार्च 1917 रोजी वाराणसी जिल्ह्यातील मोतिकोट या खेडेगावात झाला. त्यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले आणि त्यांनी एमए आणि एलएलबी या पदव्या संपादन केल्या होत्या. राजनारायण यांनी वाराणसीहून साप्ताहिक “जनमुख’ प्रकाशित केले आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांनी स्थापित केलेल्या मासिक “जान’च्या संपादकीय मंडळावर काम करून पत्रकारिता सिद्ध केली होती.विद्यर्थिदशेतच ते राजकारणात ओढले गेले.राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी प्रौढांसाठी एक शाळा, मुलींसाठी एक शाळा, एक अभ्यास केंद्र आणि कामगार संस्था स्थापन केली होती.
वर्ष 1934 मध्ये ते कॉंग्रेस सोशॉलिस्ट पक्षाचे सदस्य झाले तसेच बनारस विद्यापीठ मंडल कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सदस्य (डीसीसी) म्हणून काम पाहत होते. वर्ष 1942 मध्ये ते भारत छोडो आंदोलनादरम्यान विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात आणि आसपास निदर्शने केली. सुरुवातीला ते तीन महिन्यांसाठी भूमिगत होते आणि नंतर भारत छोडो आंदोलनादरम्यान 28 सप्टेंबर 1942 रोजी त्यांना अटक करण्यात आली आणि 1945 पर्यंत कारावासात ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या आणि समाजवादी चळवळीच्या अनुषंगाने 15 वर्षांच्या कालखंडांत त्यांना सुमारे 58 वेळा कारावास भोगावा लागला.
भारत स्वतंत्र झाल्यावर राजनारायण आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या समाजवादी पक्षात सामील झाले. वर्ष 1952 मध्ये ते उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले आणि 1962 पर्यंत विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. सुरुवातीस सीएसपी, सोशॉलिस्ट पार्टी, प्रजा सोशॉलिस्ट पार्टी या तीन पक्षांशी त्यांचा संबंध होता. त्यानंतर समाजवादी पार्टी, संयुक्त सोशॉलिस्ट पार्टी, सोशॉलिस्ट पार्टी (लोहिया), भारतीय लोकदल, जनता पार्टी, जनता पार्टी(एस), अशा समाजवादी चळवळीशी संबंधित पक्षांसोबत ते राहिले. डॉ. लोहिया यांनी त्यांचे वर्णन शेर आणि गांधी यांची प्रवृत्ती असणारी व्यक्ती असे केले होते. स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय राजकारणातील ते मुख्य नायक ठरले. वर्ष 1975 मध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर इंदिरा गांधींचे सर्वात मोठे टीकाकार आणि विरोधी म्हणून ओळखले जात.
दोन वर्षांच्या कालखंडानंतर इंदिराजींनी निवडणूक घेतली यामध्ये त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा अभूतपूर्व पराभव झाला. राजनारायण यांच्याकडून त्या पराभूत झाल्या. मात्र, जनता पक्षाचे सरकार फार काळ टिकले नाही. राजनारायण राजकारणात जनता पक्ष राजवटीत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व ठरले होते. 1980 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघात ते कमलापती त्रिपाठी यांच्याकडून पराभूत झाले.त्यानंतर राजकारणात ते फारसा ठसा उमटवू शकले नाहीत. 31 डिसेंबर 1986 रोजी जेव्हा त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्या बॅंक खात्यात केवळ 1,450 रुपये होते. यावरून त्यांच्या साधेपणाची ओळख पटते. अभिवादन.