सर्वेक्षणातून बाब समोर
पुणे – महानगरांमध्ये आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सुमारे 35 टक्के मुले ही मजुरी काम करत असल्याचे आढळून आले आहे. लॉकडाऊननंतर यात आणखी चार टक्क्यांनी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर अशा जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण केले आहे. बालमजुरीविरोधी अभियानाच्या वतीने हा सर्वेक्षण करण्यात आला. त्यात ही माहिती समोर आली. स्थलांतरित मजुरांमध्ये बालमजुरांचे प्रमाण जास्त आहे. बहुतेक वेळेला मुलांसह संपूर्ण कुटुंबच रोजगाराच्या शोधात स्थलांतरित होते. हे मजूर आपल्या मुलांनाही कामाला लावतात. अनेकवेळा मुलांना कामाला लावले नाही तरी त्यांना घरातील कामे करण्यास भाग पाडले जाते. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे या मुलांना शाळेत पाठविले जात नाहीत.
लॉकडाऊननंतरच्या काळात पैशांची जास्त गरज असणार आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला रोजगार शोधावा लागणार आहे. लॉकडाऊन काळातही 15 ते 20 दिवस काम केल्याचे काही मुलांनी सांगिल्याचे अभियानाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.