जळोची -देशात जेवढे इथेनॉल उत्पादित होईल, तेवढी आपली इंधनाची आयात कमी होऊन परकीय चलन वाचेल. हे होताना साखर उद्योगामध्ये होणाऱ्या इथेनॉल निर्मितीवर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी केंद्र सरकारने घेतली पाहिजे. त्यासाठी इथेनॉलसंदर्भात राष्ट्रीय धोरण ठरले पाहिजे, असे मत माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी पत्रकारांशी बालताना व्यक्त केले.
सोमेश्वरनगर (ता.बारामती) येथील सोमेश्वर सहकारी साखर कारन्यात भेटीसाठी आले असता पवार बोलत होते. ते म्हणाले, साखर उद्योगावर बॅंकांचे व्यवहार अवलंबून आहेत. साखर ठेवून तिच्यावर कर्ज काढण्याची पद्धत कमी होऊ लागली आहे. त्यामुळे साखर बनवण्याऐवजी इथेनॉल बनवण्याकडे कारखान्यांचा कल वाढला आहे.
इथेनॉलचे पैसे महिना ते दिड महिन्यात मिळतात. तर साखरेचे वर्षभरात मिळतात. त्यामुळे वर्षभरात व्याजाचा बोजा कारखान्यावर पडतो. त्यामुळे कारखान्यांची प्रवृत्ती दुसऱ्या रस्त्याने जाण्याकडे वळली. त्याचा थेट परिणाम जिल्हा बॅंकांवर व्हायला लागला आहे. काही राज्ये अशी आहेत, जिथे उसाचे पिक होते. अशा राज्यांमध्ये धान्यांपासून इथेनॉल निर्मिती करणारे कारखाने यायला लागलेत. ही गोष्ट वाईट नाही, असेही ते म्हणाले