वाफगाव – खेडच्या पूर्व भागात मार्च महिन्याच्या मध्यावरच दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून हंडाभर पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. पाणीटंचाई अधिकच तीव्रतेने जाणवत असताना, पाणीटंचाई उपाय योजना फक्त कागदावरच दिसून येत असल्याने आठ गावांती ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. दरम्यान, टॅंकरची मागणी ग्रामपंचायतींनी प्रशासनाकडे केली असून ही मागणी लवकर पूर्ण न झाल्यास पाण्यासाठी ग्रामस्थांचा उद्रेक झाल्याशिवाय रहणार नाही हे मात्र नक्की!
यंदा पाऊस कमी झाला असून वेळ नदीला एकही पूर आला नाही. त्यामुळे बंधारे, नाले, तळी भरलीच नव्हती आता सद्यस्थितीत ही तळी, बंधारे, नाले कोरडेठाक पडल्यामुळे पाणीबाणीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे कनेरसर-पूर, गोसासी, वरूडे, वाफगाव, गुळाणी, गाडकवाडी, जऊळके, वाकळवाडी या गावांची भिस्त आता टॅंकरवर असल्याने टॅंकरची मागणी ग्रामपंचायतींनी केली आहे. त्यामुळे एप्रिल, मे महिना कसा जाईल, या विंवचनेने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
कनेरसरमधील कंपन्यांना निमगाव येथील कॅनॉलमधून पाणी येते. मग पिण्यासाठी पाणी का येऊ शकत नाही, असा सवाल या भागातील जनता विचारत आहे. शेतकऱ्यांची जनावरे व कुटुंबातील व्यक्ती यांना दररोज लागणारे पाणी शेतकरी विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर टॅंकर सुरू करण्याची मागणी सरपंचांनी केली आहे. यावेळी हा उन्हाळा तीव्र असून पाण्याचा जपून वापर करावा व प्राणी पशु-पक्ष्यांनाही पाणी मिळेल यासाठी झाडांखाली पाणी ठेवावे, असे आवाहन वरूडे गावचे सरपंच मारूती थिटे यांनी केले.